Skip to main content
x

आपटे नारायण हरी

नारायण हरी आपटे यांचे घराणे सांगली जिल्ह्यातील समडोळी येथील होते. पायी देशाटन करावे म्हणून त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच घर सोडले. भटकंती करताना ते हिंदी व उर्दू भाषा शिकले. त्यांनी साताऱ्याजवळ कोरेगाव येथे स्वत:ची प्रकाशन संस्था उभी केली आणि त्या दरम्यान त्यांचे लेखन सुरू झाले. ‘कपट जाल’, ‘अर्वाचीन रामराज्य’, ‘भुरळ’ या त्यांच्या सुरूवातीच्या कादंबऱ्या होत्या.

     आपटे यांच्या ‘लांछित चंद्रमा’ आणि ‘रजपुतांचा भीष्म’ या कादंबऱ्यांवरूनच बाबूराव पेंटर यांनी मूकपटाची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या पहिल्या सामाजिक मूकपटाचे लेखनही आपटे यांनीच केले. त्यांनी लिहिलेल्या ‘भाग्यश्री’ कादंबरीवरून शांतारामबापूंनी ‘अमृतमंथन’ हा चित्रपट काढण्याचे ठरवले. त्याचे संवादलेखन आपटे यांनी केले.

     आपटे यांनी काही संसारकथाही लिहिल्या. प्रभाततर्फे शांतारामबापूंनी आपटे यांच्याच ‘न पटणारी गोष्ट’ या कथेवर आधारित ‘कुंकू’ हा चित्रपट काढला. ‘अन्याय सहन न करणारी बंडखोर नायिका, नीरा’ हिची भूमिका शांता आपटे यांनी केली होती. हा चित्रपट खूपच यशस्वी ठरला. सर्वोत्तम चित्रपट म्हणून या चित्रपटाला १९३७ सालचे ‘गोहर’ सुवर्णपदक देण्यात आले होते.

     पुढे शालिनी सिनेटोनसाठी बाबूराव पेंटर यांनी आपटेंच्या ‘हृदयाची श्रीमंती’ या कादंबरीवरून ‘प्रतिभा’ हा बोलपट काढला. त्यानंतर ‘ध्रुवकुमार’ या चित्रपटाचे लेखनही आपटे यांनी केले. त्यांनी १९४८ साली शांताराम आठवलेंसाठी ‘भाग्यरेखा’ या चित्रपटाचे लेखन केले. या चित्रपटात शांता आपटे, बाबूराव पेंढारकर, पु.ल. देशपांडे यांनी भूमिका केल्या होत्या. ‘उमज पडेल तर’ (१९३९), ‘संसार करायचा मला’, ‘कुंकवाचा धनी’ असे चित्रपट आपटे यांच्या कादंबऱ्यांवर आधारित होते. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव येथे नारायण हरी आपटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

- द.भा. सामंत

आपटे नारायण हरी