Skip to main content
x

ब्यूह्लर, योहान गेऑर्ग

    योहान गेऑर्ग ब्यूह्लरचा जन्म जर्मनीतील हानोव्हर प्रांतातील बोस्ट्रेल येथे झाला. इ.स.१८५८ मध्ये त्यांनी ग्योटिंगेन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली. लोकसाहित्याचे अभ्यासक आणि प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ थिओडोर बेन्फे हे त्यांचे गुरू. त्यांचे सुरुवातीचे लेखन हे तौलनिक भाषाशास्त्र (झहळश्रश्रिसिू) आणि वैदिक पुराणशास्त्र (चूींहश्रिसिू) यांविषयी होते. प्रथम तौलनिक भाषाशास्त्राचा केवळ एक भाग म्हणून संस्कृतचा अभ्यास करणार्‍या ब्यूह्लर यांना संस्कृतमध्ये अधिकाधिक रुची वाटू लागली व त्यामुळेच भारतात येण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.

     इ.स. १८६२ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण खात्यात जागा आहेे, असे समजताच लगेचच ते मुंबईत दाखल झाले, मात्र त्यांना कबूल करण्यात आलेली ती जागा आता रिकामी नसल्याचे लक्षात आले; पण एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य सर अलेक्झांडर ग्रँट यांच्याशी परिचय होऊन ब्यूह्लर त्या महाविद्यालयाचे संस्कृतचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. ब्यूह्लर तेथे संस्कृत, लॅटिन या भाषा, झहळश्रश्रिसिू आणि प्राचीन इतिहास हे विषय शिकवत असत. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अनेक उत्तम संस्कृत ग्रंथांची भर पडली. भारतीयांना युरोपातील संशोधन पद्धतीची माहिती करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर संस्कृताभ्यासाच्या प्रगतीसाठी पारंपरिकरीत्या शिक्षण घेतलेल्या पंडितांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत होते. एखाद्या शास्त्र्याची निवड संस्कृत प्राध्यापकाचा सहायक म्हणून केली जावी अशी शिफारस त्यांनी सरकारला केली, युरोपातील आणि प्राचीन हिंदू शिक्षणपद्धतीतील चांगल्या गोष्टी एकत्र करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. त्या काळात विद्यार्थिदशेत असलेले आणि नंतर भारतातील आधुनिक संस्कृतविद्येचे अग्रणी ठरलेले रामकृष्ण भांडारकर, शंकर पां. पंडित, काशीनाथ तेलंग, वामन शि. आपटे यांसारख्यांवर ब्यूह्लरच्या या प्रयत्नांचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो.

     इ.स. १८६५-१९६६ मध्ये ‘बॉम्बे संस्कृत सिरीज’ या प्रसिद्ध प्रकाशनमालेची योजना आखण्यात आली. चिकित्सक आणि विद्वत्तापूर्ण संपादनामुळे या मालिकेतील पुस्तके जगभरातल्या संस्कृताभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली. योहान ब्यूह्लर आणि आणखी एक जर्मन विद्वान फ्रांन्स कीलहॉर्न हे त्यातील पहिले संपादक होते. या मालिकेमध्ये ब्यूह्लरने पंचतंत्रांची २ ते ५ ही तंत्रे आणि दंडीच्या दशकुमारचरिताचा पहिला भाग संपादित केला.

     इ.स.१८७० मध्ये ब्यूह्लरने मुंबई सरकारच्या शिक्षणखात्यातील उत्तर विभागाचा र्एीवलरींळिि खिीशिलीिीं म्हणून काम करण्यास सुरुवात केली. प्राच्यविद्येच्या दृष्टीने हा एक भाग्यकारक योग होता, असे म्हणावे लागेल. पुढील दहा वर्षे त्यांनी आपल्या अखत्यारीतील जिल्ह्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचे कार्य केले. गुजरातमधील प्राथमिक शिक्षणाचा पाया ब्यूह्लरच्या कामामुळे घातला गेला असे म्हणता येईल. सरकारी महाविद्यालयात शिक्षक आणि परीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे पश्चिम भारतातील प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील गुणवत्ता वाढण्यास मदत झाली.

     या नियुक्तीचा उपयोग ब्यूह्लरने अत्यंत समर्थपणे विविध प्रदेशांतील संस्कृत व प्राकृत हस्तलिखिते गोळा करण्यासाठी केला. या प्रकारच्या कामाची गरज त्यांनी युरोपात असतानाच ओळखली होती. भारतात आल्यावर त्यांनी वैयक्तिकरीत्या या कामाला लगेचच सुरुवात केली होती. तेव्हा त्यांनी सुमारे ३०० हस्तलिखित पोथ्या गोळा केल्या. त्यांचे कौशल्य आणि उत्साह यांपासून प्रेरणा घेऊन मुंबई सरकारने १८६६मध्ये त्यांना दक्षिण महाराष्ट्रातून आणि उत्तर कर्नाटकातून सरकारसाठी पोथ्या गोळा करण्याकरिता नेमले. इ.स. १८६६ ते १८६८ या काळात त्यांनी २०० पोथ्या मिळवल्या. इ.स. १८६८ मध्ये भारत सरकारने संपूर्ण भारताकरिता अशा स्वरूपाचा प्रकल्प हाती घेतला. अर्थातच मुंबई इलाख्यात ह्या कामाचे नेतृत्व ब्यूह्लरकडे आले. इतर इलाख्यांपेक्षा मुंबई इलाख्यात हे काम अधिक प्रभावीपणे आणि अधिक काळ चालू होते. ब्यूह्लर भारतात असेपर्यंत, म्हणजे इ.स. १८६८ ते १८८० या काळात सरकारसाठी २,३६३ दुर्मीळ पोथ्या मिळविण्यात आल्या. या कामात प्रा. कीलहॉर्न यांचाही सहभाग होता. सत्तरच्या दशकाच्या शेवटी रा.गो. भांडारकरही या प्रकल्पात सहभागी झाले. सुरुवातीला हा संग्रह एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर इ.स. १८७५मध्ये तो पुण्यात डेक्कन महाविद्यालयाला हलविण्यात आला. इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९१५ पर्यंत गोळा करण्यात आलेल्या सगळ्या पोथ्या त्या संस्थेकडे १९१८ मध्ये सुपूर्द केल्या गेल्या.

     ब्यूह्लरने शोधून काढलेल्या अनेक ग्रंथांवर पुढे मौलिक संशोधन केले गेले. पंडितांशी संस्कृतमध्ये संंवाद साधत तर सर्वसामान्यांसाठी मराठी, गुजराती किंवा हिंदी या भाषांचा आधार घेत, त्यांच्या परंपरेशी एकरूप होऊन, धर्माचा, प्रथांचा, भावनांचा आदर राखत, हजारो वर्षे जुन्या अशा इतिहासाचा, साहित्याचा मागोवा घेण्यासाठी ब्यूह्लरने या गावातून त्या गावात, प्रसंगी दुर्गम भागातून प्रवास करीत जिद्दीने, धैर्याने आणि कौशल्याने केलेले काम अतुलनीय असेच म्हणावे लागेल.

     प्राच्यविद्येच्या दोन शाखा त्यांनी नष्ट होण्यापासून वाचवल्या. १) काश्मिरी ग्रंथसंपदा, ज्यामध्ये वैदिक ग्रंथ, काश्मिरी शैवतंत्राच्या पोथ्या, राजतरङ्गिणीसारखे महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ, दारा शुकोहने पर्शियन भाषेत अनुवाद करवून घेतलेले भागवतपुराण यांचा अंतर्भाव होतो. २) श्वेतांबर जैनांचे संस्कृत व प्राकृत ग्रंथ. ज्यांच्या आधारे वेबर, याकोबी, क्लाट, लॉयमान या संशोधकांनी आपले ग्रंथ लिहिले. ब्यूह्लरने जमवलेल्या एकूण सुमारे ३००० पोथ्यांमुळे केवळ जैनच नव्हे तर इतर अनेक प्राच्यविद्याशाखांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली. या कामाचे त्यांनी लिहिलेले अहवालसुद्धा सविस्तर आणि महत्त्वाचे आहेत. विशेषत: काश्मीर, राजपुताना आणि मध्य भारत येथील १८७५-१९७६मध्ये केलेल्या हस्तलिखित सर्वेक्षणांच्या अहवालांमुळे त्यापूर्वी अज्ञात असलेल्या अनेक ग्रंथांची आणि ग्रंथकारांची ओळख जगाला झाली. उदाहरणार्थ, काश्मीरचा इतिहास लिहिणार्‍या क्षेमेन्द्रचे साहित्य ब्यूह्लरच्या प्रयत्नांमुळेच उजेडात आले. या अहवालांमध्ये पोथ्यांचे वर्गीकरण करून त्यांची संक्षिप्त यादी दिलेली आहे. तसेच त्यांचे साहित्यिक आणि ऐतिहासिक मूल्यमापनही केलेले आहे. त्याच धर्तीवर पुढे भांडारकर आणि पीटरसन यांनी त्यांचे अहवाल लिहिले.

     ब्यूह्लरचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे अनेक पुराभिलेखांचा शोध, वाचन आणि अर्थ लावून त्यांचा ऐतिहासिक कालानुक्रम ठरविणे. त्यांचे या संदर्भातील १६०हून अधिक शोधनिबंध खविळरि अिींर्ळिींरीू, एळिसीरहिळर खविळलर यांसारख्या संशोधनविषयक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. त्यांपैकी सुमारे ५३ निबंध हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांविषयी होते. प्रा. मॅक्सम्यूलर यांनी संस्कृत साहित्याच्या अभ्यासाच्या आधारे संस्कृत साहित्याच्या पुनरुज्जीवनाचा सिद्धान्त मांडला होता. त्यांच्या मते संस्कृत साहित्याचा प्रवाह इसवीसनाच्या आधी काही काळ कुंठित झाला असावा. इसवीसनाच्या ४थ्या शतकापासून संस्कृत साहित्यात नवचैतन्य निर्माण झाले आणि उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण होऊ लागल्या. पण ब्यूह्लरने पुराभिलेखांतील पुराव्यांच्या आधारे वरील सिद्धान्त खोडून काढला आणि असे दाखवून दिले की, संस्कृत साहित्यनिर्मिती कधीही थांबली नव्हती व संस्कृत साहित्याच्या विकासाचा काळ इसवीसनाच्याही पूर्वीचा ठरतो. अशाच प्रकारे पुराभिलेखांच्या मदतीने वैदिक शाखांचा विकास आणि देशाच्या विविध भागांतील त्यांच्या प्रसाराचा मागोवा घेता येणे शक्य आहे, असे ब्यूह्लरचे मत होते. प्राचीन भारतीय लिप्यांच्या इतिहासासंबंधी त्यांनी जि ींहश जीळसळि षि ींहश खविळरि इीरहाळ अश्रहिरलशीं हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी ब्राह्मी, खरोष्ठी या लिपी आणि ब्राह्मी अंक यांचा उदय व विकास यांविषयी मूलभूत असे सिद्धान्त मांडले आहेत. भारतीय पुरालिपिशास्त्रविषयीचा सर्वंकष अभ्यास मांडणारा त्याचा ग्रंथ म्हणजे खविळरि झरश्ररशसिीरहिू होय.

     ब्युह्लरने जैन धर्माची स्वतंत्र ओळख पटवून देण्यापूर्वी जैन धर्म ही बौद्ध धर्माची केवळ एक शाखा मानली जात होती. जैन धर्म हा बौद्ध धर्माच्या समकालीन पण स्वतंत्र धर्म होता, हे प्रतिपादन जैन धर्माच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले. प्रसिद्ध वैयाकरणी आणि कोशकार जैन मुनी हेमचन्द्रांचे चरित्रही त्यांनी लिहिले.

     संस्कृतमध्ये रूढार्थाने ऐतिहासिक स्वरूपाची काव्ये फारशी नाहीत. क्षेमेन्द्राची राजतरंगिणी व बिल्हणाचे विक्रमाङ्कदेवचरित ही त्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. हे ग्रंथ ब्यूह्लरनेच उजेडात आणले. त्यांपैकी त्यांनी विक्रमाङ्कदेवचरित संपादित केले. तर राजतरंगिणीविषयी आपल्या अहवालामध्ये सविस्तर चर्चा केली. प्राचीन भारताचा सविस्तर आणि बृहत् असा इतिहास लिहावा अशी त्यांची योजना होती, पण अकाली ओढवलेल्या मृत्यूमुळे ते काम त्यांच्या हातून होऊ शकले नाही. भारतीय फिलॉलॉजी आणि पुरातत्त्वविद्या यांची अशी बहुधा एकही शाखा नाही की ज्या शाखेविषयी ब्यूह्लरने काही मूलभूत संशोधन केले नाही. भारतीय विद्येतील कोणत्याही शाखेसंबंधी आधी झालेल्या संशोधनाचा आढावा घेताना ब्यूह्लरचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतके त्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. इ.स.१८६७ मध्ये सर रेमंड वेस्ट यांच्याबरोबर त्यांनी ढहश ऊळसशीीं षि कळर्विी ङरु हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी उपलब्ध धर्मशास्त्रीय ग्रंथांचा आढावा घेतला. अशा स्वरूपाचा तो पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर त्यांनी आपस्तम्बधर्मसूत्राची चिकित्सित आवृत्ती काढली. कोणत्याही धर्मसूत्र ग्रंथाचे अशा प्रकारचे संपादन त्यापूर्वी झाले नव्हते. आपस्तम्ब, गौतम, वसिष्ठ आणि बौधायन या धर्मसूत्रांचे तसेच मनुस्मृतीचे त्यांनी केलेले भाषांतर मॅक्स म्यूलरच्या डरलीशव इिज्ञिी षि ींहश एरीीं या मालिकेत प्रसिद्ध झाले. मनुस्मृतीच्या भाषांतराबरोबरच मुनस्मृतीचे इतर धर्मशास्त्रीय ग्रंथांबरोबरचे संबंध स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही थोडे अपवाद वगळता तोपर्यंत महाभारताविषयी फारसे संशोधन झाले नव्हते. त्यातही फक्त अंतर्गत पुराव्यांचाच आधार घेतला गेला होता. ब्यूह्लरने महाभारतासाठीसुद्धा पुराभिलेखांचा आणि संस्कृतसाहित्यातील इतर ग्रंथांचा आधार घेतला. त्यांचे हे संशोधन उििीींळर्लीींळििी ीिं ींहश कळीीिीूं षि ींहश चरहरलहरीरींर या नावाने प्रसिद्ध झाले. या विषयात आणखी संशोधन होण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांपैकी विशेषत: मोरिझ विंटरनिट्त्स या विद्वानाने पुढे उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीची गरज आग्रहाने प्रतिपादली आणि त्यासाठी पुढाकार घेतला.

    त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भारतीय विद्वानांशी आणि पंडितांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध. यामुळे त्यांना भारतीय मनाचा आणि विचारांचा जवळून परिचय होता. भारतीय इतिहास आणि संस्कृती यांच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आवश्यक असलेली दृष्टी त्यातून त्यांना लाभली होती. पंडित भगवानलाल इंद्रजी या ज्येष्ठ अभ्यासकाने पुरातत्त्व आणि पुराभिलेखांविषयी गुजराती भाषेत लिहिलेल्या लेखांचे त्यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर केले होते. भारताविषयी परदेशात केले जाणारे लेखन भारतीयांना सहज समजावे या हेतूने ते इतर युरोपीय भाषांत न करता इंग्लिशमधूनच प्रसिद्ध केले जावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वत: बर्‍याचदा जर्मनऐवजी इंग्लिशमधूनच लिहीत असत.

     उपखंडातील हवामानाचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाल्यामुळे इ.स. १८८० मध्ये त्यांना युरोपात परत जावे लागले. ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील विद्यापीठात संस्कृत आणि भारतीय विद्या अध्यासनावर लगेचच त्यांची नियुक्ती झाली. संस्कृत शिकविण्याची जी पद्धत त्यांनी भारतातील महाविद्यालयात वापरली, त्याच पद्धतीने त्यांनी तिथेही संस्कृत शिकवायला सुरुवात केली. जर्मन विद्यार्थ्यांना जर्मन भाषेतून संस्कृत शिकता यावे म्हणून संस्कृतचे प्राथमिक धडे देणारे एक पुस्तक त्यांनी लिहिले. ते पुस्तक इतके उपयुक्त ठरले की दोनच वर्षांत अमेरिकेत त्याचे इंग्लिश भाषांतर प्रसिद्ध झाले. ब्यूह्लर आणि मार्टिन हॉग यांनी भारतातील शाळांमध्ये माध्यमिक स्तरावर संस्कृत शिकवण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला त्या पद्धतीला अनुसरून हे पुस्तक लिहिलेले आहे. व्हिएन्ना विद्यापीठात त्यांनी प्राच्यविद्या संस्थेची स्थापना केली. व्हिएन्ना हे प्राच्यविद्या संशोधनाचे एक केंद्र बनावे हा त्यामागे हेतू होता. त्यासाठीच तळशिरि जीळशिींरश्र र्गिीीरिश्र सुरू करण्यात आले. त्यांच्या पुढाकारामुळे आणि मदतीने प्राच्यविद्यांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये भारतातील पुरातत्त्व आणि पुराभिलेखांच्या संशोधनासंबंधी भारत सरकारला विनंती करणारे ठराव वेळोवेळी संमत केले गेले.

     आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या एलिूलश्रिशिवळर षि खविि-ईूरि ठशीशरीलह या प्रकल्पाच्या कामात ते मग्न होते. जगभरातल्या विविध देशांतील संशोधकांचा सहभाग असलेला, भारतविद्येच्या सर्व अंगांना कवेत घेणारा असा विस्तृत प्रकल्प प्राच्यविद्येच्या क्षेत्रात त्यापूर्वी झाला नव्हता आणि त्यानंतर कधी झाला नाही. त्या अंतर्गत प्राच्यविद्यासंशोधनाचाही स्वतंत्र इतिहास लिहिण्यात आला. ब्यूह्लरने यातील तब्बल २८ ग्रंथांचे संपादन केले.

     अभ्यासातील शंका असोत, काही सल्ला हवा असो किंवा भारतातील नोकरीसाठी शिफारसीची आवश्यता असो; आपल्या सहकार्‍यांना आणि विद्यार्थ्यांना ते नेहमीच मदत करत असत. विंटरनिट्त्सने असे नमूद केले आहे की, ब्यूह्लरच्या वर्गात कधीही नसलेले अनेक जण स्वत:ला त्यांचे विद्यार्थी म्हणवून घेत. विंटरनिट्त्सच्याच शब्दांत सांगायचे तर कळी ळिीळिीरींळििी ुशीश ािीश ुिविशीर्षीश्र ींहरि हळी ीलळशलिश, त्यांच्या कार्याची प्रेरणा त्यांच्या विद्येपेक्षा अधिक प्रभावी होती.

     १८९८मध्ये झुरिक येथे असलेल्या आपल्या कुटुंबासमवेत ईस्टर साजरा करण्यासाठी व्हिएन्ना येथून निघून वाटेत एका गावात त्यांनी मुक्काम केला. ८ एप्रिल रोजी त्या गावातील एका मोठ्या तलावात एकटेच नौकाविहार करत असताना ते दुर्दैवाने बुडून मरण पावले. काही कामानिमित्त व्हिएन्ना येथेच त्यांना थांबावे लागले असावे, असे त्यांच्या पत्नीला वाटले. शोध घ्यायला सुरुवात होऊन त्या गावातील हॉटेलात मुक्कामी परत न आलेली व्यक्ती म्हणजे प्रा. ब्यूह्लर होते, हे कळायला १६ एप्रिल उजाडला. ना त्यांचा मृतदेह मिळाला ना मृत्यूचे नेमके कारण कळू शकले. प्राचीन भारताच्या गूढ अज्ञाताचा मागोवा घेणार्‍या या संशोधकाच्या मृत्यूचे कारण अज्ञात आणि एक गूढ बनून राहिले.

अमृता नातू

संदर्भ
१.   इंडियन अँटिक्वरी, १८९८ खंड २७, पा.क्र.३३७-३८६
ब्यूह्लर, योहान गेऑर्ग