Skip to main content
x

भूतकर, जनार्दन गणपत

राजशेखर

        वळपास पाच दशके मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजे राजशेखर. जनार्दन गणपत भूतकर हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथील एम.आर. हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील रात्र महाविद्यालयात झाले. राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालजींकडे पटकथा लिहिण्याचे काम करत होते. १९५८ साली भालजी पेंढारकरांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टरची छोटी भूमिका रंगवली. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची हीच सुरुवात होय. त्यानंतर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते भालजींच्या कंपनीत दाखल झाले. त्या काळात अभिनेते जयशंकर दानवे खलनायकाच्या भूमिका करत असत. त्याच्याबरोबर राजशेखर यांनीही खलनायक म्हणून काही चित्रपटांतून काम केले. त्यानंतर ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. ‘साधी माणसं’ (१९६५) या भालजींच्याच चित्रपटात त्यांनी फक्कडराव ड्रायव्हरची भूमिका केली तसेच, या चित्रपटाचे साहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. ही भूमिका लोकप्रिय झाली आणि भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव ‘राजशेखर’ ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला. ‘मल्हारी मार्तंड’, ‘बारा वर्ष सहा महिने तीन दिवस’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘धर्मकन्या’, ‘लाखात अशी देखणी’ (१९८२), ‘जोतिबाचा नवस’ (१९७५), ‘वारणेचा वाघ’ (१९८४) अशा अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला. याच दरम्यान ‘संगोळी रायण्णा’ या कन्नड चित्रपटातही त्यांनी अभिनय केला, तसेच ‘दो ठग’, ‘नेत्रहीन साक्षी’, ‘दो छोकरी’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या.

        मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच अनेक नाटकांतही त्यांनी काम केले. ‘आज इथं तर उद्या तिथं’, ‘बेबंदशाही’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘चोर सोडून संन्यासी’ या नाटकात त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या आणि ‘रिश्ते-नाते’, ‘छोटे बाबू’, ‘युगांतर’ या दूरदर्शन मालिकांतूनही काम केले. त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात खलनायक साकारला. रंगभूमीवर, छोट्या पडद्यावरही ते आभिनय करत राहिले. कामावरच्या त्यांच्या निष्ठेला या सगळ्या यशाचे श्रेय जाते.

       प्रेक्षकांनी घातलेल्या शिव्या हाच माझा पुरस्कार आहे असे स्वत:चे वैशिष्टय सांगणार्‍या राजशेखर यांच्या खलनायकी भूमिकांमुळे ग्रामीण भागातील स्त्रिया त्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहात. हेच त्यांच्या खलनायकी भूमिकांचे वैशिष्ट्य होते.

- संपादित

भूतकर, जनार्दन गणपत