Skip to main content
x

देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण

पु.ल. देशपांडे

    ‘कुबेर’ (१९४७) या भूपाल पिक्चर्सच्या चित्रपटाद्वारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले. मो.ग. रांगणेकर यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते, दिग्दर्शन ही सारी अंगे-उपांगे सांभाळली होती. पु.ल.ना त्या चित्रपटात एक छोटी भूमिका होती व त्यामध्ये संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांच्या संगीत निर्देशनाखाली त्यांनी एक गीतही म्हटले होते.

     मग पुढच्या वर्षी पु.लं.नी शांताराम आठवले दिग्दर्शित ‘भाग्यरेखा’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका केली होती. त्याच साली, म्हणजे १९४८ साली प्रकाशित झालेल्या ‘वंदे मातरम’ या चित्रपटात ते आपली पत्नी सुनीता देशपांडे यांच्याबरोबर नायकाच्या भूमिकेत चमकले होते. १९४९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मानाचं पान’ या चित्रपटाचे ते संगीत दिग्दर्शक बनले. त्यानंतर त्यांनी ‘मोठी माणसं’ (१९४९) व ‘देव पावला’ (१९५०) या दोन चित्रपटांना संगीत दिले. ‘गोकुळचा राजा’ (१९५०) या चित्रपटाचे कथा, संवाद, पटकथा आणि गीते ही सारी कामे त्यांनी इतर काही जाणत्या लोकांबरोबर केली. १९५० सालीच ‘जोहार मायबाप’ हा चित्रपट आला, त्यामध्ये ते पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत चमकले. ‘नवरा बायको’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व संगीत त्यांचे होते, तर ‘पुढचं पाऊल’ (१९५०) या चित्रपटात ते पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत दिसले. अच्युत रानडे यांच्या जोडीने त्यांनी ‘वर पाहिजे’ (१९५०) या चित्रपटाची कथा लिहिली, तर या चित्रपटाचे सारे संवाद त्यांचेच होते.

     १९५१ साल कोरडेच गेले. पण १९५२ साली पुन्हा एकदा पु.लं.ची लेखणी प्रकाशमान झाली. ‘दूधभात’ची कथा, पटकथा व संवाद त्यांनी लिहिले, तर ‘घरधनी’ या चित्रपटासाठी पटकथा व संवाद त्यांच्या लेखणीतून उतरले. एवढेच नव्हे, तर या दोन्ही चित्रपटांचे संगीतही त्यांनीच दिले होते.

     त्यानंतर १९५३ साली ‘अंमलदार’ हा चित्रपट आला. ‘इन्स्पेक्टर जनरल’ या प्रहसनावरून पु.लं.नी त्याची कथा मराठीत आणली होती. पु.ल. व ग.दि. माडगूळकर या दोघांनी मिळून पटकथा व संवाद लिहिले होते. संगीत तर त्यांचे होतेच, शिवाय त्या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिकाही केलेली होती. दत्ता धर्माधिकारी यांना ‘महात्मा’ (१९५३) हा चित्रपट मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत केला होता. त्याची कथा पु.लं.ची होती. ‘माईसाहेब’ (१९५३) या चित्रपटासाठी त्यांनी पटकथा, संवाद व संगीत हे तीन विभाग सांभाळलेले होते. ‘देवबाप्पा’ (१९५३) या चित्रपटासाठी पटकथा, संवाद व संगीत त्यांनी केले होते; तर काही गीते ग.दि. माडगूळकर यांनी व काही पु.लं.नी लिहिली होती. या चित्रपटाबरोबरच ‘नवे बिऱ्हाड’ नावाचा विनोदी लघुपटही दाखवला जात असे. त्याचे लेखन व संगीत पु.लं.नी सांभाळले होते. शिवाय त्याचे धावते समालोचनही पु.लं.नीच केले होते.

     याच वर्षी आलेला ‘गुळाचा गणपती’ हा पु.लं.चा आणखी एक चित्रपट. त्यामध्ये ‘सबकुछ पु.ल.’ होते. त्याची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन व संगीत पु.लं.नी सांभाळले होते. एवढेच नव्हे, तर त्यामध्ये प्रमुख भूमिका त्यांचीच होती. ‘सुंदर मी होणार’ या त्यांच्या नाटकावरून दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी ‘आज और कल’ हा चित्रपट सादर केला होता. तो १९६३ साली पडद्यावर आला. त्यानंतर जवळजवळ ४० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांची पटकथा व संवाद असलेला ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट १९९२ साली पडद्यावर आला. पु.लं.नी १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘संदेश’ या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली होती.

     पु.लं.नी मराठी चित्रपटसृष्टीसाठी कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, चरित्र अभिनेता, नायक वगैरे अनेक बाबी सांभाळून बहुमोल कार्य केले. ‘एक होता विदूषक’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट.

शशिकांत किणीकर

देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण