Skip to main content
x

आपटे, अच्युत शंकर

      कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान आणि गणित विज्ञानात सर्जनशील प्रतिभा असणाऱ्या डॉ. अच्युतराव आपटे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील जमखिंडी येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण जमखिंडी येथे झाले, तसेच महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालय, पुणे येथे झाले. त्यांना महाविद्यालयात अनेक पारितोषिके मिळाली. त्यांनी १९४२ सालच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास घडला. तथापि, तुरुंगातून सुटल्यावर ते थेट बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेसॉन फील्ड्स’ या भौतिकशास्त्रातल्या विषयावर संशोधन करू लागले आणि पुढे त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. मात्र स्वतंत्र गणिती संशोधनास वाहून घेण्याची प्रज्ञा असताना, १९४९ सालापासून खडकवासला येथल्या भारत सरकारच्या केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्थेच्या गणित विभागात संशोधन अधिकारीपदाची त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, ती १९७९ साली संगणक विभागप्रमुख म्हणून पायउतार होईतो, त्यांनी समर्थपणे निभावली. तीस वर्षांच्या या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी समस्यांची उकल करण्यासाठी अथक प्रयत्न करून अच्युतरावांनी गणिती प्रतिकृतीच्या (मॅथेमॅटिकल मॉडेल्स) अनेकविध प्रणाली निर्माण केल्या. त्यांपैकी काही तर आव्हानात्मक होत्या. अशा गणिती प्रतिकृती विकसित करून संशोधनाच्या या क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा भारत सरकारने गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

     या प्रतिकृतींचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी संगणकाची आवश्यकता होती. मात्र १९६० सालच्या दशकात भारतात तुरळक ठिकाणीच ते उपलब्ध होते. त्यांपैकी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत असलेल्या संगणकावर डॉ. आपटे यांच्या प्रतिकृती अभ्यासता आल्या. पुढे १९७० सालच्या दशकात या कामात त्यांनी झपाट्याने लक्षणीय प्रगती केल्यामुळे, तत्पूर्वी जलविद्युत केंद्रात जलीय प्रमाणित प्रतिकृतीच्या (हायड्रॉ लिक स्केल मॉडेल्स) संशोधनासाठी होणारा वापर दहा वर्षांच्या काळात ९० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आला व गणिती प्रतिकृतींचा वापर जो सुरुवातीस नगण्य होता, तो ५० टक्क्यांपर्यंत वाढला. परिणामी, केंद्राची वेळ व खर्च या दोहोंतही बचत होऊ लागली. याचे सारे श्रेय डॉ.आपटे यांच्या दूरदृष्टीला जाते.

    भारत व बांगला देशांच्या सरहद्दीतून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा व निम्नगंगा (लोअर गँजेस) या नद्यांना सालोसाल येणाऱ्या महापुराचा तडाखा दोन्ही राष्ट्रांना दरसाल बसतो. त्यातून होणारी अपरिमित वित्त व जीवितहानी वाचवण्यासाठी उभय राष्ट्रातल्या पुराची झळ बसणाऱ्या प्रदेशात संयुक्तरीत्या पूरनियंत्रण प्रकल्प राबवण्याचे युनेस्कोने सुचवले. या समस्येची उकल करण्यासाठी ३५० अव्यक्ते (चले) व सुमारे ७१५ समीकरणे एकसमयावच्छेदेकरून सोडवणे अपरिहार्य होते. त्यासाठी गणिती प्रतिकृतींची आखणी करून प्रकल्प मार्गी लावण्याचे शास्त्रज्ञांपुढे असलेले जबरदस्त आव्हान भारत सरकारने विश्वासाने जलविद्युत केंद्रापुढे ठेवले. अर्थातच, अखंड परिश्रम करून सहा महिन्यांच्या अल्पावधीत अच्युतरावांनी या कामात यश मिळवले इतकेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्या प्रतिकृतीतून युनेस्कोच्या मूळ प्रणालीतल्या त्रुटी दाखवून दिल्या.

     अच्युतरावांनी सोडवलेला दुसरा आव्हानात्मक प्रश्‍न होता हुगळी नदीतल्या उपसा केंद्रातून कोलकाता शहराला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा. बंगालच्या उपसागरातून हुगळी नदीत येणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण खूप असल्याने ते पिण्यायोग्य नसे. सागरातून येणारे पाणी कमीतकमी क्षारयुक्त असावे यासाठी अच्युतरावांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून आधीच्या दहा वर्षांच्या काळातल्या सागराच्या भरती व ओहोटीचा अभ्यास करणे सुकर झाले. परिणामी, हुगळी नदीवरील सर्वांत कमी क्षार असलेले पाण्याचे ठिकाण निवडणे शक्य झाले व तिथल्या उपसा केंद्रातून मिळणारे पाणी पिण्यायोग्य ठरले.

    १९५२-१९५५ या अवधीत फ्रान्समधील ग्रिनोबल विद्यापीठात गणिती संशोधनासाठी अच्युतराव राहिले असताना, त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांवर त्यांचे मार्गदर्शक अत्यंत खूष झाले. या काळात गणिताच्या कुशल प्राध्यापक असलेल्या त्यांच्या पत्नी मधुमालतीबाईदेखील उच्च बीजगणितावर संशोधन करण्यासाठी फ्रान्समध्ये गेल्या. दोघेही अनुक्रमे बी.एस्सी. व पीएच.डी. या उच्च पदव्या संपादन करून स्वदेशी आले. अच्युतरावांच्या संपूर्ण सामाजिक कार्यामागची केवळ प्रेरणाच नव्हे, तर परिपूर्ण शक्ती अशी भूमिका त्यांच्या जीवनात मधुमालतीबाईंनी बजावली.

    जगात कुठेही भूकंप झाला तरी जमिनीखाली विशिष्ट खोलीवर बसवलेल्या भूकंपमापन यंत्रावर त्यांची नोंद होते. त्यावर उमटलेला आलेख पाहून भूकंपाची तीव्रता, संभाव्य ठिकाण (एपीसेंटर) व बहुमजली इमारतींना असलेला धोका ओळखता येतो. मात्र, असे यंत्र जमिनीखाली बसवण्यापूर्वीच जर भूकंप झाला, तर आलेखावरून अशी माहिती मिळत नाही. १९६७ साली, १०/११ डिसेंबरच्या रात्री कोयनेस झालेल्या भूकंपाबाबत असेच घडले. यंत्र जमिनीखाली बसवण्यापूर्वी भिंतीतल्या उंच जागी ठेवले होते. एवढ्यात, रात्री ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला आणि उंच जागी ठेवलेल्या यंत्रावर जो आलेख आला त्यावरून मूळ आलेख मिळवणे, ही शास्त्रज्ञांची एक कसोटीच होती. अशा प्रसंगी, प्रयत्नांची शिकस्त करून अच्युतरावांनी मूळ संभाव्य आलेख मिळवण्यात यश संपादन केले.

     फ्रान्समध्ये असतानाच, फ्रेंच सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राहण्या-जेवण्याची मोफत सोय करते हे लक्षात घेऊन अच्युतरावांच्या मनात विद्यार्थी साहाय्यक समितीचे बीज अंकुरले असावे. गणितात मूलभूत संशोधन करून मोठे नाव मिळवण्याची संधी असताना, त्याकडे पाठ फिरवून अच्युतराव समाजकार्याकडे वळले. ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’, ‘इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन’ आणि ‘फ्रेंच मित्र मंडळ’ ही त्यांची तीन सामाजिक अपत्ये. शिक्षणाची इच्छा असूनही गरिबीमुळे ग्रमीण भागातल्या असंख्य मुलांना शहरात राहण्या-जेवण्याच्या सोयीअभावी शिक्षण सोडावे लागते. हे जाणून १९५६ साली विद्यार्थी साहाय्यक समितीची स्थापना करून अच्युतरावांनी विद्यार्थ्यांची अल्पदरात ही सोय केली. उत्तम संस्कार, व्यक्तिविकासाबरोबर श्रमशक्तीची जाणीव करून देताना समितीच्या मनात ना उपकाराची भावना ना विद्यार्थ्यांच्या लेखी लाचारीची, असे वातावरण ठेवले. गेल्या ४०/४२ वर्षांत मुलांसाठी दोन व मुलींसाठी एक अशी तीन वसतिगृहे बांधली आहेत. तेथे ४०० ते ५०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवली जाते.

     अशाच प्रकारे मनुष्यबळातली गुंतवणूक (इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन) ही दुसरी सामाजिक संस्था, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील ग्रमीण परिसरात, फुगेवाडी येथे अच्युतरावांनी काढली. तेथे निराधार बालकांवर सुसंस्कार करण्यासाठी बालसदन, नरसी मोनजी तंत्रशाळा उभारण्याबरोबरच ग्रमीण भागातील तरुणांना शेती, दुग्धव्यवसाय, छपाई व इतर औद्योगिक व्यवसायांतले कसब आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देण्याची ही व्यवस्था केली. त्यांतून अनेकांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध झाले. दोन्ही संस्थांत अच्युतराव निर्मळ वृत्तीने विश्वस्त राहून, संस्थांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याबद्दल दक्ष असत.

    फ्रान्समधील वास्तव्याच्या काळात फ्रेंच सभ्यता, ख्रिस्ती धर्माबद्दल आस्था आणि फादर दलरी, लेदर्ले यांच्याबरोबर केलेल्या तत्त्वचिंतनातून अच्युतरावांनी फ्रेंच  मित्र मंडळ काढले. उभय देशांतल्या नागरिकांत वेगवेगळ्या विषयांवर आदानप्रदान होऊन परस्परांच्या देशाबद्दल योग्य ज्ञान व्हावे, हा यामागचा उद्देश होता. दरवर्षी काही काळ भारतीय नागरिक फ्रान्समध्ये, तर फ्रेंच नागरिक भारतामध्ये ठेवणे अशी आखणी होऊन आजवर हजारो नागरिकांना परस्परांच्या देशांतल्या समाजजीवनाचा परिचय झालेला आहे.

    फ्रेंच मित्र मंडळातर्फे गेली पस्तीस वर्षे फ्रान्सचे नागरिक भारतात येणे आणि भारतीय नागरिक फ्रान्समध्ये जाणे ही व्यवस्था चालू आहे. यामुळे ह्या दोन देशांत सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हायला मदत झाली.

    यातून अच्युतरावांच्या आंतरभारती दृष्टीची साक्ष पटते. 

- प्रा. स. पां. देशपांडे

आपटे, अच्युत शंकर