Skip to main content
x

कांबळे, जीवनकला दत्तोबा

जीवनकला

     दत्तोबा कांबळे व गंगूबाई कांबळे या कलावंत दांपत्याच्या पोटी जीवनकला यांचा जन्म पुणे येथे झाला. गंगूबाई यांनी एकेकाळी मूकपटाचा काळ गाजवला होता. ‘फिअरलेस नादिया’चा उदय होण्यापूर्वी गंगूबाई तशाच प्रकारची चित्तथरारक कामे करीत. त्यामुळे त्या काळात ‘स्टंट क्वीन’ असा त्यांचा लौकिक झाला होता. पुढे बोलपटातूनही त्यांनी कामे केली. वडील दत्तोपंत हेही चित्रपटात कामे करीत.

     मंगेशकर कुटुंबाने सुरू केलेल्या ‘सुरेल बाल कला केंद्र’मध्ये  अनेक  बाल कलाकार कामे करीत. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत कुडाळकर, प्यारेलाल शर्मा, कल्याणजी, आनंदजी, बाळ पार्टे, जयवंत कुलकर्णी, कुमारसेन गुप्ते, अरविंद मयेकर, अशी पुढे मोठेपणी नाव झालेली कलावंत मंडळी त्यात होती. छोट्या जीवनकलाही सुरेल बाल कला केंद्रात नृत्य करीत असत. तेव्हापासून जीवनकला मंगेशकर कुटुंबातल्याच झाल्या.

      १९५२ साली दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अखेर जमलं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. वसंत शिंदे, सूर्यकांत, बेबी शकुंतला, यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात राजा गोसावी व शरद तळवलकर या विनोदी अभिनेत्यांनी प्रथमच भूमिका केली होती. त्याचप्रमाणे ‘बेबी जीवनकला’ या नावाने जीवनकलाही या चित्रपटात बालतारका म्हणून चमकल्या. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत ‘नृत्यांगना’ म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांत कामे केली. हेलन, जयश्री टी, बेला बोस, अशा अनेक नृत्यांगनांच्या बरोबरीने जीवनकला यांनी अविस्मरणीय नृत्ये केली.

      १९६० साली ‘संगत जडली तुझी नि माझी’ या प्रभाकर नायक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात जीवनकला यांचे नायक राजा गोसावी असूनही या चित्रपटाचा फारसा बोलबाला झाला नाही. त्यानंतरच्या ‘अवघाचि संसार’ (१९६०), ‘उमज पडेल तर’ (१९६०), ‘पुत्र व्हावा ऐसा’ (१९६१), ‘चिमण्यांची शाळा’ (१९६२), ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ (१९६२), ‘सूनबाई’ (१९६२), ‘हा माझा मार्ग एकला’ (१९६३), ‘दैवाचा खेळ’ (१९६४), ‘काय हो चमत्कार’ (१९६४), ‘मराठा तितुका मेळवावा’ (१९६४), ‘तुका झालासे कळस’ (१९६४), ‘वैशाख वणवा’ (१९६४), ‘शेरास सव्वाशेर’ (१९६६), ‘सुदर्शन’ (१९६७), ‘मानाचा मुजरा’ (१९६९), ‘काळी बायको’ (१९७०), ‘ती मी नव्हेच’ (१९७०) अशा अनेक चित्रपटात सहनायिकेच्या वा खलनायिकेच्या भूमिकेत चमकल्या.

     राजा ठाकूर दिग्दर्शित ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटात, त्यांनी प्रेमभंगामुळे निराश झालेल्या प्रेयसीची भूमिका केली होती. त्यातील ‘जिथे सागरा धरणी मिळते’ हे अप्रतिम गाणे त्यांच्यावरच चित्रित झाले होते. चित्रपट चांगला चालला व त्यांच्या भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक झाले. आपली मुलगी नायिका व्हावी म्हणून वडील दत्तोपंत कांबळे यांनी १९६८ साली ‘जानकी’ हा चित्रपट खास त्यांच्यासाठी निर्माण केला. या चित्रपटात (दोस्ती फेम) सुधीरकुमार त्यांचे नायक असूनही हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही.

     जीवनकला यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी खूप गाजली. ‘अखेरचा हा तुला दंडवत’, ‘रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी’ (मराठा तितुका मेळवावा), ‘साडी दिली शंभर रुपयांची’ (वैशाख वणवा) ही गाणी कुणीच विसरू शकणार नाही. ‘पारसमणी’ या हिंदी चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा’ या गाण्यावर त्यांनी सादर केलेले नृत्य लोकप्रिय झाले. नृत्याबरोबरच जीवनकला यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतील भूमिकातून आईवडिलांचा अभिनयाचा वारसा जपला. त्यांनी स्वतंत्रपणे केलेले नृत्याचे कार्यक्रमही गाजले.

     प्रसिद्ध पटकथा-संवादलेखक राम केळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दुर्दैवाने राम केळकरांचे अकाली निधन झाले. जीवनकला यांनी संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांचा मुलगा हेमंत लेखक व दिग्दर्शक आहे, तर मुलगी मनीषा ही अभिनेत्री आहे. जीवनकला यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. २०१० साली पी.सावळाराम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

     - मधू पोतदार

कांबळे, जीवनकला दत्तोबा