Skip to main content
x

कटरागड्डा, पदय्या

पदय्या, के.

     भारतीय पुरातत्त्व क्षेत्रात प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करणारे आणि पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात मूलगामी भर टाकणारे कटरागड्डा पदय्या यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पामुलपाडू या छोट्या गावात झाला. आंध्र विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी घेतल्यांनंतर ते पुण्यात आले आणि त्यांनी डेक्कन कॉलेजमधून १९६५मध्ये एम.ए. पूर्ण केले. त्यांनी, पद्मभूषण या सन्मानाने गौरवण्यात आलेल्या प्रा. ह.धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली १९६८मध्ये पीएच.डी. संपादन केली. ‘उत्तर कर्नाटकातील शोरापूर दुआबातील प्रागैतिहासिक व इतिहासपूर्व संस्कृती’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

     हॉलंडमध्ये काही काळ संशोधन केल्यानंतर पदय्या १९७२मध्ये डेक्कन कॉलेजात व्याख्याता म्हणून रुजू झाले. प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ अध्यापन केल्यानंतर ते २००३मध्ये डेक्कन कॉलेजचे संचालक झाले. हे पद भूषवून निवृत्त झाल्यावरही पदय्यांची ज्ञानलालसा आणि जिज्ञासा कमी झालेली नाही. ते सध्या डेक्कन कॉलेजमध्ये सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून संशोधनाचे कार्य करत आहेत. प्रा. पदय्या जरी जन्माने मराठी नसले, तरी महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी मानून त्यांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ पुरातत्त्वात मोलाची कामगिरी केली आहे.

     प्रा. पदय्यांनी कर्नाटकातील हुन्सगी आणि बैचबाळ खोर्‍यांमध्ये अत्यंत प्राचीन अशा अशुलियन या पुराश्मयुगीय आणि नवाश्मयुगीन संस्कृतीच्या अवषेशांवर जवळजवळ दोन दशके सखोल असे संशोधन केले आहे. त्यांनी हुन्सगी, येदियापूर आणि इसामपूर पुराश्मयुगीय स्थळांचे उत्खनन केले. या त्यांच्या या कामामुळे भारतीय पुरातत्त्वात प्रथमच पुराश्मयुगातील मानवी जीवनाचे साकल्याने आकलन होऊ शकले. शोरापूर दुआबात प्रा. पदय्यांनी कोडेकल आणि बुदिहाळ या नवाश्मयुगीन स्थळांचे उत्खनन केले आणि त्या वेळच्या कृशी-पशुपालक सांस्कृतिक जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हे करत असताना त्यांनी पुरातत्त्वातील सर्व पद्धतींचा उपयोग केला.

     भारतीय पुरातत्त्वात हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच लोकांनी सिद्धान्तांचा विचार केला. प्रा. पदय्या त्यामधील एक व जगभर मान्यता असलेले एक आहेत. पुरातत्त्वीय सिद्धान्तांमध्ये १९५०नंतर आमूलाग्र बदल घडून आले व नवपुरातत्त्वाचा (New Archeology)उदय झाला. प्रा. पदय्यांनी यानंतर निर्माण झालेल्या चर्चांमध्ये सहभाग तर घेतलाच, शिवाय नवपुरातत्त्वाने पुरस्कार केलेल्या प्रक्रियावादी तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनात कसा वापर करायचा ते दाखवून दिले. या संदर्भातील त्यांचा ‘न्यू आर्किओलॉजी अँड आफ्टरमॅथ’ (१९९०) हा ग्रंथ आजही मैलाचा दगड मानला जातो. पुरातत्त्वीय सिद्धान्त हा समजायला आणि शिकवायला अवघड विषय ते अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवत असत. अनेकदा, ‘उन्हात काम करणे टाळणारे लोक आरामखुर्चीत पुरातत्त्वीय सिद्धान्तांची मांडणी करतात’ अशी सिद्धान्तावर काम करणार्‍यांची कुचेष्टा केली जाते व त्यांच्याकडे दृर्लक्ष केले जाते. परंतु स्वत: दीर्घकाळ प्रत्यक्ष उत्खनन व क्षेत्रीय कार्य केले असल्याने प्रा. पदय्यांच्या आग्रही प्रतिपादनाकडे दुर्लक्ष करता येत नाही.

     प्राचीन सांस्कृतिक स्थळांमध्ये घडणारे बदल आणि त्यांच्यावर होणारे विविध परिणाम यांचा अभ्यास (Site formation Processes) पुरातत्त्वात १९९० नंतर सुरू झाला. प्रा. पदय्यांनी सातत्याने भारतीय पुरातत्त्वात अशा अभ्यासांचा आग्रह धरला व २००७ मध्ये या विषयावरील ग्रंथाचे त्यांनी संपादन केले.

    पुरातत्त्वाचा इतिहास आणि विविध विद्वानांनी केलेले योगदान हा प्रा. पदय्यांच्या आवडीचा विषय आहे. ‘एसेज इन हिस्ट्री ऑफ आर्किओलॉजी‘ (२०१३) आणि ‘रिव्हायटलायझिंग इंडियन आर्किओलॉजी‘ (२०१६) हे ग्रंथ त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची साक्ष देतात. आपण जे काम करतो, त्यात आपल्या गुरुजनांचा मोठा वाटा असतो, म्हणून त्यांचे स्मरण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे असे ते नेहमी सांगतात. त्यांनी स्वत: त्यांचे गुरु त्यांचे प्रा. ह.धी. सांकलिया आणि प्रा. इरावती कर्वे यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करून त्यांचे वृत्तान्त प्रकाशित केले आहेत.

     प्रा. पदय्यांचे शंभरापेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झालेले असून जगभर त्यांचे संदर्भ सातत्याने दिले जातात. अनेक संस्थांना पुरातत्त्व क्षेत्रातील प्रा. पदय्यांच्या अनुभवाचा फायदा झाला. ते २००५ ते २०११ या काळात भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे (ICHR) सदस्य होते. त्याचप्रमाणे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व सरकारच्या अनेक तज्ज्ञ समित्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

   प्रा. पदय्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक मानसन्मान लाभले. दोन वेळा (१९८६ व १९९९) त्यांनी फुलब्राइट फेलो म्हणून अमेरिकन विद्यापीठांमध्ये संशोधन व अध्यापनकार्य केले आहे. कोलकाताच्या बंगीय साहित्य परिषदेने २००२मध्ये राखालदास बॅनर्जी पदकाने त्यांचा गौरव केला. लंडनमधील सोसायटी ऑफ अ‍ॅन्टिक्वेरीज या संस्थेने २०११मध्ये त्यांना मानद सदस्यत्व दिले. त्यांच्या अर्धशतकातील कार्याची दखल घेत भारत सरकारने पद्मश्रीने त्यांचा सन्मान केला.

   - डॉ. प्रमोद जोगळेकर

कटरागड्डा, पदय्या