Skip to main content
x

मिर्जा, अली अकबर खान

खान, मिर्जा अली अकबर

      मिर्जा अली अकबर खान यांचा जन्म मुंबईला झाला. १८९६ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. इंटरनंतर १८९९ मध्ये एलएल.बी. च्या पहिल्या वर्षाची परीक्षा ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. १९०१ मध्ये त्यांनी तर्कशास्त्र आणि नैतिक तत्त्वज्ञान हे विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) ही पदवी प्राप्त केली. १९०१ मध्येच  सरकारच्या शिष्यवृत्तीवर ते इंग्लंडला गेले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या सेंट जॉन्स महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथून मॉरल सायन्स ट्रायपॉस घेऊन त्यांनी १९०३ मध्ये बी.ए. पदवी संपादन केली आणि जून १९०४ मध्ये ते इनर टेंपलमधून बॅरिस्टर झाले.

       मुंबईला परत आल्यावर खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून वकिलीस सुरुवात केली आणि लवकरच ते एक यशस्वी वकील म्हणून प्रसिद्धीस आले. १९०९ ते १९१४ या दरम्यान ते ‘गव्हर्नमेंट लॉ स्कूल’मध्ये प्राध्यापक होते आणि १९१४ पासून १९१९ पर्यंत प्राचार्य होते. या दरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे फेलो होते. नंतर सिडिंकेटचे सदस्य आणि डीन होते आणि मग कुलगुरू झाले. त्याचप्रमाणे १९०६ पासून १९२२ पर्यंत ते पर्शियाचे (इराण) मुंबईतील मानद कौन्सल होते.

        २५ नोव्हेंबर १९२४ रोजी खान यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. १८ फेब्रुवारी १९२६ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. त्यांनी मूळ आणि अपील या दोन्ही शाखांमध्ये न्यायदान केले. नवोदित वकिलांपासून ज्येष्ठ वकिलांपर्यंत सर्वांना सारख्याच सहृदयतेने वागवून चोख न्याय देण्याबद्दल त्यांची ख्याती होती.

        उच्च न्यायालयातील आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात न्या.खान यांनी व्यापारविषयक कायदा, लवाद कायदा, जमिनीचा कायदा, पोलीस कायदा, संपत्ती हस्तांतरण कायदा, न्यायालयाच्या अवमानाचा कायदा, दिवाळखोरीचा कायदा, यांमधील त्याचप्रमाणे हिंदू आणि मुस्लीम कायदा आणि फौजदारी कायदा अशा कायद्याच्या विविध शाखांमधील अनेक गुंतागुंतीच्या खटल्यांत महत्त्वाचे निर्णय दिले. १९३२ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. मुंबईतील अनेक शिक्षणसंस्थांशी न्या.खान यांचा निकट संबंध होता. न्यायाधीशपदावर असतानाच त्यांचे निधन झाले.

- शरच्चंद्र पानसे

मिर्जा, अली अकबर खान