Skip to main content
x

पेंडसे, मधुकर दिनकर

           धुकर दिनकर पेंडसे यांचा जन्म कोकणातील वेरळ या खेड तालुक्यातील गावात झाला. वेरळ येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना खेड येथे दाखल व्हावे लागले. कोकणात भरपूर पाऊस, आठ महिने झुळझुळत वाहणारे नदीनाले, हिरवा निसर्ग म्हणूनच मी भावी आयुष्यात जल क्षेत्राकडे वळलो असे सांगणारे पेंडसे, दहावीच्या परीक्षेत १९५७ मध्ये जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने पास झाले, व इंटरच्या शिक्षणासाठी ते मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. १९५९मध्ये इंटर झाल्यानंतर त्यांनी वालचंद महाविद्यालय, सांगलीहून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. १९६२ मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि साहाय्यक अभियंता म्हणून ते कोयना जलविद्युत प्रकल्पात रुजू झाले.

          संस्कारक्षम कुटुंबातून आलेल्या पेंडसेंनी आयुष्यभर आपल्या घासातला घास इतरांना देऊन त्यांची दु:खे निवारण्याचे काम केले. समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो आणि आपण ते दिले पाहिजे या जाणिवेने आयुष्यभर झटणाऱ्या मधुकर पेंडसेंचे जीवन म्हणजे एक समाजसमर्पित व्रतस्थ जीवन आहे. समाजाला सुखकारक आणि उपयुक्त ठरतील अशाच योजना त्यांनी अमलात आणल्या व सामान्य नागरिकाला अडचणीत आणणार्‍या योजनांमध्येही त्यांनी सुधारणा केल्या.

          कोयना धरणग्रस्तांच्या प्रकल्प उभारणीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्या होत्या, त्या जमिनींची नुकसानभरपाईही शासन शेतकऱ्यांना धनादेशामार्फत देत होते. पण त्या भागातील शेतकरी अशिक्षित होते. त्यांना बँकेचे व्यवहार करता येत नव्हते. यातून सर्रास शेतकऱ्यांची फसवणूक व्हायला लागली. तेव्हा ही नेमकी अडचण एक उत्तम प्रशासक असलेल्या पेंडसे यांच्या लक्षात आली आणि शासनाकडे विनंती करून पेंडसे यांनी या सर्व शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मोबदला देण्याची व्यवस्था केली.

           याच कोयना प्रकल्पासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याच भागातील तरुणांना नोकऱ्या दिल्या जात. यासाठी दूरदूरच्या खेडेगावांतून अनेक गरीब मुले कार्यालयात येत. बसची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना रात्रीचे तिथेच अडकून पडावे लागत असे. ही त्या गरीब तरुणांची अडचण मधुकर पेंडसे यांनी ओळखली आणि नोकरभरतीसाठी विशिष्ट तारखा ठरवून ज्या भागातून नोकरीसाठी तरुण येत, त्याच भागात त्या दिवसापुरते कार्यालय हलविण्याची व्यवस्था पेंडसे यांनी केली आणि तरुणांना नोकऱ्या दिल्या.

           युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे पेंडसे यांना जल-व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी रशियाला पाठविण्यात आले. पेंडसे यांनी रशियात जाऊन तिथल्या जलव्यवस्थापन शास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्या वेळी भारतात अशा प्रकारचा कुठलाही अभ्यास केला गेला नव्हता. रशियातून अभ्यास करून आलेल्या पेंडसे यांनी भारतात पहिल्यांदाच जलविज्ञानाचे कार्यालय उघडले आणि त्याद्वारे अभ्यासाला सुरुवात केली. याद्वारे भारतीय जलाच्या प्रवाह दिशा, त्यांचे ओघ, पाणी साठवण्याची ठिकाणे, बाष्पीभवनाचे प्रमाण अशा वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासाला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर पुढे जलविज्ञानाचे मुख्य कार्यालय नाशिकला उघडण्यात आले आणि व्यापक पातळीवर  त्याचा अभ्यास व संशोधन सुरू झाले. याचे जनक आहेत मधुकर पेंडसे.

           पाटबंधारे विभागाच्या पुणे कार्यालयात पेंडसे यांची नियुक्ती झाली. अगदी त्याच दिवशी मुसळधार पाऊस झाला आणि पुण्याच्या जवळील असलेले एक धरण फुटायला सुरुवात झाली. त्याचा धोका रात्रीच्या वेळी अधिक वाढला. त्या धरणावरचा अभियंता घाबरलेला होता. तेव्हा रात्री दोन वाजता कालव्यातून वाहणाऱ्या चार फूट पाण्यातून पेंडसे धरणात पोहोचले. हे धरण मातीचे होते. मुसळधार पाऊस सुरू होता आणि धरणाला भेग पडली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच सैन्य बोलवायला हवे याबाबत सगळीकडून पेंडसे यांना विचारले जाऊ लागले. पण हे धरण वाचवता येईल अशी खात्रीच पेंडसे यांनी वरिष्ठांना दिली. पेंडसे स्वत: उपस्थित राहून त्यांनी कर्मचाऱ्यांना धीर दिला. कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन आधी त्यांनी दगड, विटांच्या मदतीने भेग बुजवली. कालव्यातूनही पाणी सोडले आणि धरणफुटीचा धोका टळला.

           सर्वसामान्य जनतेचे सामाजिक प्रश्न व्यवस्थापनाच्या कुठल्याही पुस्तकात लिहिलेले नसतात असे पेंडसे म्हणतात. त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊनच जनतेचे सामाजिक प्रश्न लीलया सोडवले. याच कामाची पेंडसे यांना अप्रत्यक्ष पावतीही मिळाली. बार्शीच्या एका शेतकऱ्याने त्याच्या एका वादाविषयी पेंडसे यांच्या वरिष्ठांना पत्र पाठवले. या पत्रातून ‘प्रकरणाची चौकशी पेंडसे यांच्याकडे सोपवावी, तरच मला योग्य न्याय मिळू शकेल,’ असे त्याने लिहिले होते. शेतकऱ्याचे हे पत्र म्हणजे पेंडसे यांच्या सत्यनिष्ठ कामाची पावती होती.

           “नेता तोच असतो जो संकटाच्या वेळी सर्वांच्या पुढे असतो, आणि सुखाच्या वेळी सर्वांच्या पाठीशी असतो,” हे वाक्य पेंडसे यांच्या तोंडी सदैव असते. प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा ते त्याच पद्धतीने जगले आणि एक अनुकरणीय आदर्श समाजासमोर ठेवला.

           १९९०मध्ये कोयना लेक टॅप स्टेज-४ कामावर त्यांची नियुक्ती झाली. या वेळी जमिनीअंतर्गत भुयार पाडून धरणाच्या मधोमध लेक टॅप घ्यावयाचा होता, अगदी या वेळी धरणाचे पाणी व भुयार यांच्यामध्ये लेक टॅपच्या ठिकाणी केवळ सहा मीटर अंतर उरले होते. या वेळी धरणालाही धोका होता.

           हा फारच अटीतटीचा प्रसंग होता. सर्व कामगार घाबरत होते. तेव्हा त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून मधुकर पेंडसे मागचा-पुढचा विचार न करता त्या ठिकाणी जाऊन थांबले. त्यांनी योग्य वेळी देखरेख केली आणि तो लेक टॅप अतिशय चांगल्याप्रकारे यशस्वी झाला. या वेळी पेंडसे त्या ठिकाणी मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

            आपल्या संपूर्ण आयुष्यात कर्तव्यदक्ष आणि समाजहितदक्ष असलेल्या पेंडसे यांना १९९८ सालचा इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचा ‘सर्वोत्कृष्ट अभियंता’ हा पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतर पेंडसे हे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी तत्त्वावर लहान स्वरूपात वीजनिर्मिती कशी करता येऊ शकते यावर संशोधन करून, शासनामार्फत ते अमलात आणण्याचे काम करत आहेत. याच हायड्रो पॉवर असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य आहेत. या माध्यमातून ते वेगवेगळ्या परिषदा भरवणे, परिषद परिसंवादात सहभाग घेणे आदी संशोधनात्मक महत्त्वपूर्ण काम करीत असतात.

- दत्ता कानवटे

पेंडसे, मधुकर दिनकर