Skip to main content
x

राजवाडे, माधव गणपत

     माधव गणपत राजवाडे यांचे वडील मेजर जनरल गणपतराव राजे हे ग्वाल्हेर संस्थानाचे सरसेनापती होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माधवराजे यांनी १९४१ मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी कॉलेज मध्ये दाखल झाले. तेथून अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यावर त्यांची निवड कोअर ऑफ इंजिनिअर्स (तेव्हाचे रॉयल इंडियन कोअर ऑफ इंजिनिअर्स) मध्ये ‘बॉम्बे सॅपर्स’ मध्ये झाली.

     दुसऱ्या जागतिक महायुद्धात त्यांची नियुक्ती पर्शिया (आताचा इराण) भागात झाली होती. तेथे असतानाच त्यांची बदली ‘मद्रास सॅपर्स’ मध्ये झाली. आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने भारतावर चढाई केल्यावर ब्रिटिशांच्या भारतीय फौजा भारताच्या पूर्व सीमापार ब्रह्मदेशात तैनात करण्यात आल्या. त्यातच माधवरावराजे राजवाडे यांची तुकडी होती. तेथेच जपानी सैन्यासोबत झालेल्या एका लढाईत त्यांनी गाजविलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना ‘मिलिटरी क्रॉस’ देऊन गौरविण्यात आले.

     तेथून भारतात परतल्यानंतर त्यांची नियुक्ती कोअर ऑफ इंजिनिअर्समध्येच कायम होती. १९६२च्या युद्धाच्यावेळी त्या भागाचे ‘कमांडर इन चिफ’ जनरल कौल यांच्या नेतृत्त्वाखाली ते मुख्य अभियंता (चिफ इंजिनिअर) होते. १९६५च्या सुमारास त्यांची ‘जनरल केडर’मध्ये पदोन्नती झाली. १९६५ च्या भारत-पाक युद्धात ते ब्रिगेडिअरपदी एकेचाळीसाव्या माउंटन ब्रिगेडचे कमांडर होते. त्यांच्या ब्रिगेडने या युद्धात चांगली कामगिरी केली.

     १९७१च्या भारत-पाक युद्धाच्यावेळी ते १५व्या कॉर्पस्चे  ‘चिफ ऑफ स्टाफ’ होते. या युद्धात त्यांनी अखनूर विभागात चांगला पराक्रम गाजवला. या युद्धानंतर लगेच भारताच्या भूसेनेच्या उत्तर विभागाची (नॉर्दर्न कमांड) स्थापना करण्यात आली. या नॉर्दर्न कमांडचे पहिले प्रमुख (‘कमांडर इन चिफ’) लेफ्टनंट जनरल पी.एस.भगत होते आणि पहिले ‘चिफ ऑफ स्टाफ’ माधवरावराजे राजवाडे होते.

     १९७१च्या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ठरविण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा दोन्ही देशांतर्फे आपआपल्या सेनादलांची एक समिती नेमण्यात आली होती. या दोन्ही देशांच्या समित्यांनी प्रत्यक्ष सीमारेषांवरच्या मोर्चांना आणि ठाण्यांना भेटी देऊन एक सर्वेक्षण केले आणि त्या आधारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची (एल.ओ.सी.-लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल)आखणी करण्यात येऊन त्यांचे नकाशे व इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यावर दोन्ही देशांच्या संबंधित सेनाधिकार्यांच्या सह्या घेण्यात आल्या. हीच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आजतागायत पाळली जाते. त्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ठरविणाऱ्या भारतीय समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल पी.एस.भगत आणि उपाध्यक्ष माधवराव राजवाडे हे होते. या समितीत भारतीय भूसेनेच्या मुख्यालयातील सैनिकी कार्यवाही विभागाचे संचालक (डायरेक्टर ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) मेजर जनरल आय.एस.गिल हेदेखील होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी या कागदपत्रांवर भारताच्या बाजूने याच तीन सैनिकी अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. निवृत्तीनंतर माधवराव राजवाडे पुण्यात स्थायिक झाले.  तेथेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

     - राजेश प्रभु साळगांवकर

राजवाडे, माधव गणपत