Skip to main content
x

सेटलवाड, चिमणलाल हरिलाल

       चिमणलाल सेटलवाड यांचा जन्म गुजराथमधील भडोच येथे झाला. त्यांचे आजोबा अंबाशंकर यांच्यापासून त्यांच्या घराण्यात वकिलीची व कायद्याच्या अभ्यासाची परंपरा चालत आली होती. अंबाशंकर हे अहमदाबादचे ‘मुख्य सदर अमीन’ होते. चिमणलाल यांचे वडील हरिलाल यांनीही न्यायखात्यामध्ये दुय्यम न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. त्या पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर ते सौराष्ट्रातील लिंबडी संस्थानाचे दिवाण होते. ही परंपरा सर चिमणलाल यांचे चिरंजीव मोतीलाल यांनी समर्थपणे पुढे चालविली.

      सर चिमणलाल यांचे शालेय शिक्षण उमरेठ आणि अहमदाबाद येथे झाले. १८८० मध्ये अहमदाबादच्या आर.सी. हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयातून १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंंतर वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी केवळ चार दिवस गुजराथमध्ये सरकारी नोकरी केली, परंतु लगेचच नोकरी सोडून कायद्याच्या अभ्यासासाठी ते पुन्हा मुंबईला आले. एलएल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १८८७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिलीस सुरुवात केली. १८९८ च्या सुमारास त्यांना मूळ शाखेतही विभागातही वकिली करण्याची अनुमती मिळाली. तोपर्यंतच एक निष्णात वकील म्हणून त्यांचे नाव झाले होते.

      सर चिमणलाल यांच्या राजकीय कार्याची तसेच एकंदर सार्वजनिक जीवनाची सुरुवात ते कायद्याचे विद्यार्थी असतानाच झाली. डिसेंबर १८८५ मध्ये मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हाचा समारंभ पाहण्यास आपण हजर होतो, असे त्यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे.

      १८८९मध्ये मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते सदस्य होते. सर चिमणलाल यांनी दीर्घकाळ विविध पातळ्यांवर लोकप्रतिनिधी म्हणून संस्मरणीय कार्य केले. १८९२ पासून १९२० पर्यंत (मधली तीन वर्षे वगळता) ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. या अवधीत १८९३ पासून १८९७ पर्यंत ते तेव्हाच्या मुंबई इलाख्याच्या उत्तर विभागातील नगरपालिकांचे प्रतिनिधी म्हणून गव्हर्नरच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. १९०३ ते १९२० अशी सलग १७ वर्षे ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळा समितीचे आधी सदस्य आणि नंतर अध्यक्ष होते. शाळा समितीमधील त्यांच्या कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षणात अनेक सुधारणा झाल्या. अनेक शाळांसाठी इमारती बांधण्यात आल्या.

      महानगरपालिकेत असतानाच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही सर चिमणलाल यांनी भरीव कार्य केले. १८९५ पासून अर्धशतकापेक्षा अधिक काळ ते मुंबई विद्यापीठाचे प्रारंभी काही काळ पदवीधरांनी निवडून दिलेले व त्यानंतर कुलपतींनी नियुक्त केलेले फेलो होते, तर १८९९ पासून १९२९ पर्यंत विद्यापीठाच्या सिंडिकेटचे सदस्य होते. या दरम्यान १९०३ ते १९१५ अशी १२ वर्षे ते विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते. याशिवाय १९१७ पासून १९२९ पर्यंत सलग १२ वर्षे ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूही होते. कुलगुरू म्हणून एवढी दीर्घ कारकीर्द त्यापूर्वी कोणासही मिळाली नव्हती आणि त्यानंतरही अद्याप कोणास मिळालेली नाही. आपल्या कारकिर्दीत सर चिमणलाल यांनी विद्यापीठात अनेक शैक्षणिक व प्रशासनात्मक सुधारणा केल्या आणि विद्यापीठाचा लौकिक वाढविला. विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), यू.डी.सी.टी. या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेला रासायनिक तंत्रज्ञान विभाग आणि इतर अनेक पदव्युत्तर विभाग त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाले. आजचे प्रसिद्ध जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्न असलेले राजे एडवर्ड स्मृती रुग्णालय (के.ई.एम.) स्थापन करण्यातही सर चिमणलाल यांची विद्यापीठ व महानगरपालिका या दोन्ही संस्थांतर्फे महत्त्वाची भूमिका होती.

       १९१५ मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या तेव्हाच्या केंद्रीय (इंपीरियल)  विधिमंडळातील जागेवर सर चिमणलाल यांची प्रथम निवड झाली. १९१७ पर्यंत ते केंद्रीय विधिमंडळात होते. नंतर १९१९च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय विधानसभेवर सर चिमणलाल १९२०मध्ये निवडून आले, पण त्याचवेळी मुंबई प्रांताच्या गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळावर त्यांची नियुक्ती झाल्यामुळे ते प्रत्यक्षात केंद्रीय विधानसभेचे सदस्य होऊ शकले नाहीत. १९२० मध्येच चार महिने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. १९२३ मध्ये त्यांनी कार्यकारी मंडळाचा राजीनामा दिल्यावर व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंग यांनी त्यांची केंद्रीय विधानसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. १९२४ मध्ये अल्पकाळ त्यांनी सभागृहाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

       १९१८ मध्ये काँग्रेसमधील नेमस्त विचारांच्या मंडळींनी नॅशनल लिबरल फेडरेशन ऑफ इंडिया किंवा लिबरल पार्टी या नावाने एक वेगळा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या स्थापनेपासून सर चिमणलाल हे त्याचे अग्रगण्य नेते होते. १९१८ मध्येच माँटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणांवर विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड साउथबरो यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दोन समित्यांपैकी एका समितीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९१९ मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या हंटर समितीच्या तीन भारतीय सदस्यांपैकी सर चिमणलाल हे एक होते. समितीत ब्रिटिश सदस्य व भारतीय सदस्य असे उभे तट पडले आणि तिन्ही भारतीय सदस्यांनी आपला स्वतंत्र भिन्नमत-अहवाल सादर केला.

      ब्रिटिश सरकारने १९२० मध्ये चिमणलाल सेटलवाड यांना ‘सर’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज्’ (एलएल.डी) ही सन्मान्य पदवी दिली.

      १९१९ च्या कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी  ब्रिटिश सरकारने १९२८ मध्ये सायमन आयोग नेमला. त्यात एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे संपूर्ण देशात असंतोष उसळला. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार टाकला. लिबरल पार्टीनेही मुंबईत या आयोगाविरुद्ध आवाज उठविला. त्यामध्ये सर चिमणलाल यांचा सक्रिय सहभाग होता. तथापि १९३० व १९३१ मध्ये लंडनमध्ये भरलेल्या अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या गोलमेज परिषदेस सर चिमणलाल हे अन्य नेमस्त नेत्यांसमवेत उपस्थित राहिले.

     आपल्या संपूर्ण कारकीर्दीत सर चिमणलाल हे तेव्हा अस्तिवात असलेल्या लहानमोठ्या संस्थानांच्या संस्थानिकांना कायद्याच्या किंवा अन्य प्रश्नांवर सल्ला देत असत, त्याचप्रमाणे न्यायालयांसमोर किंवा अन्यत्र त्यांची बाजू मांडीत असत.

      ‘रिकलेक्शन्स अ‍ॅन्ड रिफ्लेक्शन्स’हे सरचिमणलाल यांचे प्रदीर्घ व उद्बोधक आत्मचरित्र १९४६मध्ये प्रसिद्ध झाले. ब्रिटिश अमदानीच्या पाऊण शतकाचा देशाचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कायदा-न्यायविषयक इतिहास त्यात प्रतिबिंबित झाला आहे.

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ
१.      सेटलवाड, चिमणलाल; ‘रिकलेक्शन्स अँड रिफ्लेक्शन्स’
सेटलवाड, चिमणलाल हरिलाल