Skip to main content
x

जोशी, मालती केशव

मालती केशव जोशी उर्फ मालती अनंत खरे यांचा जन्म बडोदा येथे झाला. मालती जोशी यांनी गणित विषयात बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर १९५५ मध्ये एम.एड. केले. त्यानंतर त्यांनी बी.ए. गणित, एम. एड., डिप्लोमा इन टीचर ऑफ द डेफ एज्युकेशन (मँचेस्टर. यु. के.) केले.

आज महाराष्ट्रभर कर्णबधिरांच्या शिक्षणाचा जो प्रसार झालेला आहे, त्याचे संपूर्ण श्रेय मालती बाईंनाच जाते. बाईंचे वडील अनंतराव खरे हे सेवासदन शाळेचे मुख्याध्यापक होते. परंतु काहीही सोय किंवा नियम नसल्याने स्वतःच्या प्रतिभा नावाच्या कर्णबधिर मुलीला मात्र ते आपल्या शाळेत प्रवेश देऊ शकले नाही. बाईंच्या मनात मात्र आपण या बाबतीत काहीच करू शकणार नाही का? असा प्रश्‍न सतत घोळत असे.

बाईंच्या लग्नानंतर त्यांना कळले की, इंग्लंडमधे अशी मुले शिकतात, एवढेच नाही तर शिक्षक प्रशिक्षणही दिले जाते. पण तोपर्यंत घरात दोन मुलांचा जन्म झालेला होता. हा यक्षप्रश्‍न त्यांचे पती केशव जोशी यांनी सहजरीत्या सोडविला. मुलांची जबाबदारी एक वर्षभर घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आणि बाई मँचेस्टरला रवाना झाल्या. मँचेस्टर येथे त्यांनी ‘डिप्लोमा इन टीचर ऑफ द डेफ’ एज्युकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण केला. 

वर्षभरात परत आल्यावर शाळा सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्या वेळचे जिल्हाधिकारी स. गो. बर्वे यांनी सहमती व पाठिंबा दर्शविला. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळींच्या ना. वि. पाटणकरांना भेटून या शिक्षणाची गरज पटवून दिली व त्यांची परवानगी मिळविली. टिळक बी.एड. महाविद्यालयाच्या बाहेर फरशीवरच ही शाळा सुरू झाली. बहीण प्रतिभासह तिच्या वयाच्या सुनंदा काटे, पेंढारकर अशा पाच मुलींच्या पटसंख्येने ही ‘राखोलीची शाळा’ (लोकांनी कुचेष्टेने ठेवलेले नाव!) सुरू झाली. शिक्षक नाही, अबोल मुले बोलणार काय? या प्रश्‍नांच्या सरबत्तीला द्यायला उत्तर सापडत नव्हते. पण शोध व ध्यास मनात होताच.

अशातच काही कारणाने त्या बनारसला गेल्या. येताना आजोळी बडोद्याला छोटा मुक्कामात प्रश्‍नाचे उत्तर सापडले. मामांनी जामदार नावाच्या शिक्षकांची गाठ घालून दिली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सोबत घेऊनच बाई पुण्यात परतल्या व शाळेला शिक्षक मिळाला. शिक्षकांची संख्या दोन झाली. तसेच मुलांचीही संख्या वाढू लागली. पालक स्वतःच मुलांना आणत व परत नेत. रोज बाईची भेट होई. रोजच सल्ला व मार्गदर्शन मिळू लागले. मुलांमध्ये सुधारणा नजरेस येऊ लागली. आपणही शाळेत जातो याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला.

विद्यार्थीसंख्या ४० वर गेली. नवीन आलेली मुले वयाने मोठी होती. त्यामुळे व्यवसाय शिक्षण हेच महत्त्वाचे शिक्षण ठरू लागले. सुतारकाम, खडी छपाई, खेळणी तयार करणे याचे शिक्षण मुलांना मिळू लागले.

१९५६ - ५७ मधे श्रीमती दुर्गाबाई देशमुख (शिक्षण संचालक-शिक्षणाधिकारी) यांनी रु. ३०,०००/- चा निधी उपलब्ध करून दिला.

रूईया यांनी नातवाच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेला देणगी दिली. १९५६ मध्ये नवीन इमारतीत शाळा भरू लागली. विद्यार्थीसंख्या वाढू लागली पण प्रशिक्षित शिक्षकच उपलब्ध नव्हते. त्यासाठी खटपट करून अभ्यासक्रम तयार केला. त्या वेळी फक्त कोलकत्यातच अशा प्रकारचे प्रशिक्षण देणे सुरू होते. शाळेत येणाऱ्या श्रीमती आगाशेंना तिथे पाठवून ३ महिन्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्यास मान्यता मिळविली. (हा अभ्यासक्रम त्या वेळी बी.एड. च्या समकक्ष मानून शिक्षकांना मान्यता मिळाली.) १९७० मधे केंद्र सरकारचे अनुदान मिळाल्याने लहान कर्णबधिरांसाठी बाह्यध्वनीविरहित खोलीची सोय शाळेत करता आली.

फारच थोडी मुले योग्य वयात शाळेत येत. लहान वयातच कर्णबधिरत्व लक्षात आल्यास वा आणून दिल्यास मुले योग्य वयात शाळेत येऊ शकतील, हे अनुभवाने कळले व त्यातून १९७८ साली शोध मोहीम संकल्पना उदयास आली. त्यासाठी निश्‍चित व ठोस कार्यक्रम तयार केला गेला व तो राबविण्यासाठी मंगळवार रूग्णालय, कमला नेहरू रूग्णालय व ससून रूग्णालय यांची परवानगी मिळवून नवजात अर्भकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली.

पुणे शहरात तर सुरुवात झाली परंतु शहरांपेक्षा खेड्यांमध्ये ही समस्या जास्त गंभीर स्वरूपात आहे, याची कल्पना आली. त्यावर विचारविनिमय करून आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जाऊन शिबिरे घेणे, कर्णबधिरत्वाची माहिती देणे, कसे ओळखावे ते सांगणे, शिकविण्याच्या पद्धती व शिक्षणाची आवश्यकता पटवून देणे यासाठी शीघ्रकवित्व लाभलेल्या मालतीबाईंनी स्वतः ओव्या रचल्या, पोवाडे रचले. ठिकठिकाणी गायनाचे कार्यक्रम घडवून आणले. पथनाट्ये पण केली. वर्तमानपत्रे व मासिकातून लेख लिहिले.

 शिक्षणास सुरुवात झाली पण पुढे काय? या मुलांचे पुनर्वसन होणे, त्यांनी पायावर उभे राहणे हेही तेवढेच महत्त्वाचे होते. त्यासाठी मोठमोठे कारखानदार, समाजकल्याण विभागातील अधिकार्‍यांना भेटून त्यांच्या नोकरीसाठी खटपट करणेही तेवढेच महत्त्वाचे ठरू लागले. या मुलांचा आत्मविश्‍वास वाढून पालकांची चिंता कमी करणेही गरजेचे होते.मुख्याध्यापिकेचे काम सांभाळून त्या  या गोष्टीही  करीत.  त्या बरोबरच शिक्षकांना, पालकांना व प्रशिक्षणार्थींना आपल्या व्यापातून वेळ काढून त्यांच्याशी चर्चा करणे, वाचादोष सुधारणेसाठीच्या  छोट्या पण महत्वाच्या गोष्टी बारकाव्यांसह सांगणे, प्रत्यक्ष करून दाखविणे ही कामेही बाई आवडीने करत.

विद्यार्थ्यांचे गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे हे त्यांचे आवडते काम. त्यांचा त्यांच्या विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्वास आहे. कर्णबधिर आठवले भगिनींना शाळेत शिक्षिका म्हणून नेमल्यावर अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले. पण या दोघींनी बाईंचा विश्वास सार्थ ठरवून दाखविला.

१९५३ ते १९५८ या काळात बाईंनी शासकीय जबाबदाऱ्या घेऊन पार पाडल्या. महिला सेवाग्राम, पुणे रिमांड होम, बेगर्स होम चेंबूर, नाशिक व मुंढव्याचे सर्टिफाईड स्कूल इत्यादी. याच काळात सर्वसामान्यांबरोबरच अनेक कर्णबधिरांचे पुनर्वसनही बाईंनी तळमळीने केले.

१९५८ मध्ये त्यांची राजपत्रित अधिकारी (गॅझेटेड ऑफीसर) म्हणून बंगला, गाडी या सोयींसह नियुक्ती झाली. परंतु या ठिकाणी राहून आपण मनाप्रमाणे काम करू शकणार नाही असे त्यांच्या लक्षात आले. त्या क्षणी त्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. एम. एड.ला त्यांनी ‘एज्युकेशन फॉर डेफ इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्सेस टू महाराष्ट्र’ या विषयात प्रबंध तयार केला. त्याच वेळेस हेलेन केलर मुंबई भेटीवर आल्या असताना त्यांनाच तो अर्पण केला.  प्रौढ विद्यार्थ्यांना नोकरी लावण्याबरोबरच त्यांची लग्ने जमवणे, घरगुती प्रश्‍न सोडविणे, न्यायालयात दुभाषक म्हणून कर्णबधिरांची कैफियत न्यायाधीश व इतरांपर्यंत पोचवणे ही कामे बाईंनी जबाबदारीने केली. बाईंच्या काळात अनेक मान्यवरांनी शाळेला भेटी व देणग्या दिल्या.

या सर्व कार्यात झोकून देऊन काम करताना बाईंनी निश्‍चय केला होता. जो पर्यंत प्रत्येक कर्णबधिराला श्रवणयंत्र मिळणार नाही तो पर्यंत मी कानात कर्णफुले घालणार नाही असा निश्‍चय त्यांनी केला व तो आजतागायत पाळला आहे. पुण्यातील बाजीराव रोड वरच्या टेलिफोन भवनाजवळील चौकाला श्रवणयंत्राचे संशोधक सऱ ग्रॅहॅम बेल यांचे नाव देण्यास त्यांनी म.न.पा. व टेलिफोन भवनातील अधिकार्‍यांना भाग पाडले. समावेशित शिक्षणाची संकल्पना (इंटिग्रेटेड एज्युकेशन) ही बाईंचीच. सर्वसामान्य मुलांबरोबर जर कर्णबधिर मूल शिकले, तर त्याची भाषा वाढ चांगली, योग्य होईल ही त्यांची इच्छा होती. त्यांनी पुण्यात गोपाळ हायस्कूल व श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळेत ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. हा उपक्रम कन्याशाळेत आजही चांगल्या रितीने चालू आहे. हळूहळू मॉडर्न हायस्कूल, आपटे प्रशाला, भावे विद्यालय, साधना विद्यालय यातूनही हा उपक्रम सुरू करण्यात आला. याचा लाभ आजही अनेक विद्यार्थी घेत आहेत. यामुळे मुलांचे सामाजिकरण योग्य रीतीने होऊन आत्मविश्‍वास वाढतो व स्वावलंबी होण्यास अडचणी कमी येतात. २३ जुलै १९७३ रोजी ‘सुहृद मंडळ’ ही विशेष शाळा व संस्था आपल्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन सुरू केली. १९८१ च्या अपंग वर्षात श्रीमती ताराबाई वर्तक मंत्री असताना शाळा भेट घडवून आणून ‘शुल्क’ माफ करवून घेण्याचे महत्त्वाचे कामही केले.

शिक्षण संचालनालयतर्फे ‘आदर्श विशेष शिक्षिका पुरस्कार’, समाजकल्याणतर्फे ‘दलित मित्र पुरस्कार’, पुणे महानगरपालिकेतर्फे ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ व पुणे विद्यापीठ, लायन्स कल्ब, रोटरी क्लब व इतर संस्थांचेही पुरस्कार मालती जोशी यांना मिळाले आहेत.

 कै. सौ. निर्मला रत्नाळीकर पुरस्कार -  कर्णबधिर मित्र मंडळ, पुणे व रत्नाळीकर परिवार, (२००१) व विद्या महामंडळ, पुणे तर्फे ‘लोक शिक्षण पुरस्कार’ (२००५) या पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. विद्या महामंडळ संस्थेने बाईंनी रचलेल्या ओव्या व कवितांचे संकलन करून १ डिसेंबर २००५ ला पु. ग. वैद्य यांच्या प्रेरणेने ‘कर्ण-बधिरांच्या भावविश्‍वात’ हा संग्रह प्रकाशित केला. ‘माझी माणसे’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद बाईंनी केला आहे.

-  ऋतुजा अ. पितळे

 

जोशी, मालती केशव