Skip to main content
x

कुलकर्णी, अतुल सुधीर

         वैशिष्ट्यपूर्ण भूमिका जिवंत करणारे अभिनेते म्हणून अतुल कुलकर्णी यांच्या नावाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक वलय आहे. भूमिकेचा खोलवर विचार करून, स्वतःच्या अनुभवाची जोड देत अतुल कुलकर्णी यांनी स्वतःला संवेदनशील अभिनेता म्हणून सिद्ध केले आहे.

     अतुल कुलकर्णी यांचा जन्म बेळगावला झाला. सोलापूरच्या हरीभाई देवकरण शाळेमध्ये शिक्षण घेतले. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी कुलकर्णी बेळगावला गेले. तिथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’च्या शिक्षणासाठी पुण्याला आले. पण ‘इंजिनिअरिंग’ न जमल्यामुळे सोलापूरच्या डी.ए.व्ही. महाविद्यालयातून ‘इंग्रजी’ साहित्यामध्ये पदवी प्राप्त केली. वडिलांना व्यवसायात मदत करताना, एकीकडे शिक्षण घेताना, सोलापूरच्या ‘नाट्य आराधना’ या हौशी नाट्यसंस्थेशी संपर्क आला आणि डॉ. वामन देगावकरांच्या सहवासात अभिनयातले बारकावे समजत गेले. या नाट्यसंस्थेमध्ये नाटक रंगमंच, कलाकार, कपडेपट, नेपथ्य आणि बॅकस्टेज समजून घेण्याची संधी मिळाली. ‘नाटक’ या माध्यमाने अतुल कुलकर्णींमधल्या अंतर्मुख स्वभावाच्या कलावंताचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी पूर्ण वेळ नाटक करण्याचा निर्णय घेतला आणि १९९२ ते १९९५ या कालावधीत ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या दिल्लीच्या नामांकित संस्थेमधून अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. याच सुमाराला नाट्याभिनयाची कारकिर्द सुरू झाली. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘चाफा’, ‘आपण सारेच घोडेगांवकर’, ‘माणूस नावाचं बेट’ या नाटकातून भूमिका केल्या. ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला.

     ‘भूमीगीता’ या १९९७ साली आलेल्या कन्नड चित्रपटापासून चित्रपटक्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला. २००० साली प्रदर्शित झालेला, कमल हसन दिग्दर्शित ‘हे राम’ या हिंदी चित्रपटातील ‘श्रीराम अभ्यंकर’ या भूमिकेपासूनच खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीमधील त्यांची वाटचाल सुरू झाली. या भूमिकेला पदार्पणातच उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता म्हणून राष्ट्रीय पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी ‘कैरी’ या मराठी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली. त्यांचा हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपटांचा दुहेरी प्रवास आजही सुरू आहे. आजपर्यंत सहा भाषांमध्ये त्यांनी परस्परभिन्न व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

     २००२ साली मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘चांदनी बार’ या चित्रपटात गुन्हेगारी जगतातील पण काही अंशी माणूसपण शिल्लक असलेला ‘पोत्या सावंत’ अतुल कुलकर्णी यांनी सहजसुंदर अभिनयाने साकारला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयसंपन्न मराठी चेहरा म्हणून त्यांचे नाव चर्चेत राहिले. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अभिनयावरची निष्ठा आणि भूमिकांची चोखंदळ निवड यामुळे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचे रंग उलगडणाऱ्या भूमिका त्यांना मिळत गेल्या.

     राजकुमार संतोषींच्या ‘खाकी’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अजय देवगण, अक्षयकुमार अशा हिंदी चित्रपटातील कलाकारांबरोबरही त्यांच्या अभिनयाची छाप पडली. ‘रंग दे बसंती’, ’88 Antop hill’, ‘सत्ता’, ‘पेज थ्री’, ‘समझोता एक्स्प्रेस’, ‘चालीस चौरासी’, ‘दिल्ली’, ‘दम, ‘ये मेरा दिल’ अशा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना अतुल कुलकर्णी यांनी प्राधान्य दिले आहे.

     ‘दहावी फ’ या २००३ साली आलेल्या चित्रपटात अभ्यासात फारशी गती नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय वर्गभेदामुळे निर्माण झालेली दरी आणि ‘गणेश देशमुख’ या शिक्षकांची विद्यार्थ्यांविषयी जबाबदारी अतुल कुलकर्णी यांनी चोख निभावली आहे. ‘भेट’ (२००२), ‘वास्तुपुरूष’ (२००३), ‘चकवा’ (२००५), ‘मातीमाय’ (२००७) अशा कलात्मक आणि व्यावसायिक अशा संमिश्र चित्रपटात भूमिका केल्या. ‘वळू’ (२००८) या उमेश कुलकर्णी दिग्दर्शित नर्मविनोदी चित्रपटात गावकऱ्यांच्या ‘वळू’विषयीच्या श्रद्धा-अंधश्रद्धा आणि खरेपणाने जगणाऱ्या गावकऱ्यांमध्ये सामावून गेलेल्या ‘फॉरेस्ट ऑफिसर’ची भूमिका केली.

     आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित आणि रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘गुणवंत कागलकर’ या तमाशा कलावंताची भूमिका अतुल कुलकर्णी यांच्या कारकिर्दीतील विशेष उल्लेखनीय भूमिका होती. एका रांगड्या तरुणाच्या मनात असलेली कलेची ओढ आणि उपजत लाभलेली कला, या कलेशी इमान राखताना वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवरचा खडतर प्रवास करणाऱ्या ‘गुणाची’ आव्हानात्मक भूमिका त्यांनी खूप मेहनतीने आणि समरसून केली. रांगडा मर्द गडी आणि तमाशातील नाच्या कलावंत या परस्परभिन्न प्रवृत्तीच्या भूमिकेसाठी देहयष्टी कमावणे आणि उत्तरार्धात स्त्रीसुलभ हालचालींना कायिक-वाचिक अभिनयाची जोड देत त्यांनी ही दुहेरी भूमिका भावस्पर्शी केली आहे.

     २०१३ साली ‘प्रेमाची गोष्ट’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटात त्यांनी प्रियकराची भूमिका केली. अतिशय विचारी आणि ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळख असलेल्या अतुल कुलकर्णी यांना व्यायामाची आणि संगीताची आवड आहे. त्यांच्या मनाचा एक कप्पा हा भवतालाशी आणि भवतालातील माणसांशी जोडलेला आहे. अडचणीत असलेल्याला मदत करताना त्यांचे ग्लॅमर कधी त्यांच्या आड येत नाही.

     अतुल कुलकर्णींचा स्पष्टवक्तेपणा, अभिनयकलेवरचे प्रेम, कामाप्रती निष्ठा याप्रमाणेच त्यांचे वाचन आणि पुस्तकप्रेम सर्वपरिचित आहे. त्यामुळेच दूरदर्शन वाहिनीवरील ‘बुकशेल्फ’ या मालिकेच्या यशाचे श्रेय त्यांना दिले जाते.

     अतुल कुलकर्णी या मनस्वी कलाकाराला आयुष्याची जोडीदार म्हणून सहाध्यायी आणि नाट्यअभिनेत्री ‘गीतांजली’ यांची साथ मिळाली आहे. त्यांना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आणि त्यानंतरही अनेक पुरस्कारांनी गौरवले. ‘दहावी फ’ या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्क्रीन व्हिडिओकॉन अ‍ॅवॉर्ड, ‘भेट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून म.टा. सन्मान, अल्फा गौरव पुरस्कार, याच चित्रपटामध्ये साहाय्यक अभिनेता म्हणून राज्य शासनाच्या पुरस्कार त्यांना मिळाला. याशिवाय २०१० साली एशिया पॅसिफिक स्क्रीन बेस्ट अ‍ॅवॉर्डसाठी ‘नटरंग’ मधील भूमिकेसाठी त्यांचे नामांकन झाले होते.

- नेहा वैशंपायन

कुलकर्णी, अतुल सुधीर