राणे, रावसाहेब दाजी
१८६० ते १९०० या कालावधीत ते मुंबई पोलीस सेवेत कार्यरत होते. रावसाहेब दाजी राणे यांना मुंबई शहराची खडानखडा माहिती होती. त्यावेळी मुंबईमध्ये मुस्लीम आणि पारशी यांच्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे महत्त्वाचे काम रावसाहेब राणे यांनी केले. कोणतेही काम अत्यंत कौशल्याने पार पाडण्याचे कसब त्यांच्या अंगी होते. आर.सी.एस. अधिकारी एम.एस.एडवर्डस् यांनी ‘मुंबई शहर पोलीस’ या पुस्तकात रावसाहेब राणे यांचे केलेले वर्णन हे त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष पटवून देते. रावसाहेब राणे यांचे वर्णन करताना एडवर्डस् लिहितात, “हा एक असा भारतीय अधिकारी होता की, फार शिकलेला नसूनही त्याच्यामध्ये नैसर्गिकपणेच पोलिसी गुण होता. कोणतेही काम अत्यंत बांधिलकीने आणि कौशल्याने करणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण विशेष होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक दशके मुंबई पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली. शहराची लोकसंख्या आणि विविध पंथांमध्ये निर्माण होणारा ताण यांचे नियोजन कसे करावे याची त्यांना उत्तम जाण होती.”
- संपादित