Skip to main content
x

आचवल, माधव भास्कर

माधव आचवल यांचा जन्म व शालेय शिक्षण कल्याण येथे झाले. चित्रकला आणि भाषा हे दोन विषय माधव आचवल यांच्या आवडीचे होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माधवरावांनी मुंबईच्या सर ज.जी. महाविद्यालयामध्ये वास्तुशिल्पकलेच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. त्या काळी गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्किटेक्चर- जी.डी. आर्च-हा चार वर्षांचा अभ्यासक्रम होता. पण ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन’ हा विषय त्यांना विशेष प्रिय होता. शेवटच्या परीक्षेत या विषयात त्यांना मेयो सुवर्णपदक मिळाले होते. आचवलांची जी.डी. आर्च अभ्यासक्रमातील असामान्य प्रगती बघून आर.आय.बीए. या संस्थेने त्यांना भाग एक व दोन या परीक्षांमधून सूट दिली. प्रोफेशनल प्रॅक्टिस या विषयाची परीक्षा त्यांना द्यावी लागली. या विषयातील त्यांची उत्तरपत्रिका इन्स्टिट्यूटने एक आदर्श म्हणून नावाजली होती.

त्यानंतर त्यांनी मुंबईत स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. आणंद येथील वल्लभ विद्यानगरच्या इमारतींचे काम त्यांच्याकडे आले. मुंबई व आसपासच्या उपनगरांतील लहानमोठी कामेही होती. कल्याणच्या प्रभाकर ओक मनोऱ्याचे काम तेव्हा त्यांनी केले. निओक्लासिकल शैलीतील हा मनोरा कल्याण नगराची शान वाढवणारा ठरलाच; पण महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेली ही वास्तू प्रमाणबद्धतेचा उत्कृष्ट नमुना आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.

१९५४ साली ते महाराजा सयाजीराव विद्यापीठात कलाभवनाच्या वास्तुशिल्पकला विभागामध्ये त्या विभागाचे प्रपाठक म्हणून रुजू झाले आणि डिपार्टमेंटचे स्वरूपच पालटू लागले. तेव्हा अहमदाबादमध्ये व्यवसाय करणारे प्रख्यात आर्किटेक्ट्स म्हणजे बाळकृष्ण दोशी, तलाठी, अनंत राजे यांना त्यांनी विभागामध्ये पाहुणे व्याख्याते म्हणून आणले. इंग्लंडमधील लेस्टर विद्यापीठामधून आर.आय.बी.ए. करून बडोद्यात आलेल्या सूर्यकांत पटेल यांना व मुंबईच्या पी.एम. पाठारे यांना पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून विभागामध्ये आणले. १९६२ सालापासून आचवल तेथे प्राचार्य पदावर काम करू लागले.

ते इमारत बांधणी, वास्तुशिल्पकला संरचना व नगर नियोजन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चरल डिझाइन व टाउन प्लॅनिंग) हे विषय शिकवीत. विषय सोपा करून तो विद्यार्थ्यांना समजवण्यात त्यांची हातोटी होती. त्यांचे वक्तृत्व श्रवणीय होते. त्यामुळे वास्तुशिल्पकलेचा अभ्यास आनंददायक असल्याचा अनुभव ते विद्यार्थ्यांना देत. आखीव अभ्यासक्रमाच्या चाकोरीतून विद्यार्थ्यांना बाहेर काढून वास्तुशिल्पकला या विषयाची गोडी निर्माण करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असे.

कलाभवनामध्ये अध्यापन करत असताना, त्यांचा वास्तुशिल्पकार म्हणून व्यवसायही चालू होता. अर्थात, त्याचा पसारा आटोपशीर होता. तशी त्यांनी मोजकीच कामे केली; पण त्यांचा दर्जा उच्च प्रतीचा होता. आणंदचे कृषी महाविद्यालय, बडोद्याचे अ‍ॅलेन्बिक स्कूल, आणंद येथील डेअरी, महुवा येथील टाउन हॉल या वास्तुरचना वाखाणल्या गेल्या. या वास्तुरचनांमध्ये त्यांची स्वतंत्र शैली जाणवते. ‘वास्तू ही अतिशय नाजूक तंतुवाद्यासारखी असते. ते नीट असेल, तरच आपल्या सर्व मन:स्थितीला अनुरूप असे झंकार त्यांतून निघू शकतात,’ असे त्यांनी लिहून ठेवले आहे.

१९५६ साली भारत सरकारने गौतम बुद्धाच्या २५०० व्या जयंतीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये स्मारक उभारण्याचे ठरविले. त्यासाठी जगभरातील वास्तुशिल्पकारांकडून स्मारक योजनेचे आराखडे मागवले होते. त्या स्पर्धेमध्ये आचवलांनी शिल्पकार सदाशिव साठे यांच्या सहकार्याने स्मारक योजनेचा आराखडा पाठविला. निवड समितीच्या सर्व सभासदांनी त्याला प्रथम पसंती दर्शवली. आचवलांना समितीने मुलाखतीला बोलावले आणि संकल्पनेमध्ये एक बदल सुचवला. काचेच्या घुमटाऐवजी प्रस्तावित घुमट सिमेंट काँक्रीट किंवा विटांमध्ये बांधायची सूचना केली. काचेचा घुमट हा तर संकल्पनेचा मूळ गाभा होता. त्यांनी सूचना साफ नाकारली. अन्यथा, त्यांना पहिले पारितोषिक व ते कामही मिळाले असते.

बडोद्यातील एका अनोख्या मंदिराची उभारणी त्यांच्या संकल्पनेतून साकारली. ते मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी होते. मंदिराला सभोवती भिंती नाहीत. सर्व धर्मांच्या प्रतीकांमधून मंदिराचा आकार साकारलेला आहे. देवाला बंदिस्त केलेले नाही. अपारंपरिक रचनेमुळे आजही लोकांना ते आकर्षित करते. देवाचे अस्तित्व भोवतालच्या आखीवरेखीव उद्यानाशी, प्रसन्न परिसराशी जोडलेले आहे. असाच अनोखा प्रयोग त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक लहानसे वास्तुशिल्प उभारून केला.

१९५९-६० साली त्यांना फ्रेंच सरकारची एक शिष्यवृत्ती मिळाली. जवळपास सहा महिने ते फ्रान्समध्ये होते. युरोपियन वास्तुशिल्पकलेचा अभ्यास व वास्तुशिल्पकला अभ्यासक्रमाची पाहणी, असा त्या शिष्यवृत्तीचा उद्देश होता. फ्रान्सला जाण्याआधी ना.गो. कालेलकरांकडे ते फ्रेंच भाषा शिकले. १९६८ साली आचवलांना ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंग्लंडला जाण्याचा योग आला. त्यातूनच पुढे अविकसित देशांतील निवारा समस्येवरील अभ्यास करून त्यावर उपाययोजना कशा तऱ्हेने करता येईल, यासाठी आफ्रिका व लॅटिन अमेरिका या देशांचा दौरा करण्याची त्यांना युनेस्कोकडून संधी मिळाली.

इतर शहरांप्रमाणे झोपडपट्टीचा प्रश्‍न बडोद्यातही होता. काहीही व कितीही उपाय केले तरी झोपडपट्टयांचे निर्मूलन होऊ शकत नाही हे आचवलांनी महानगरपालिकेच्या लक्षात आणून दिले. मलनि:सारण, पाणीपुरवठा या सुविधा तेथे योग्य प्रकारे पुरवून झोपडपट्टयांची सुधारणा होऊ शकते. त्याप्रमाणे, महानगरपालिकेने आचवलांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी सुधारण्याचे प्रयोग राबविले. स्वस्त घरबांधणी हा विषय त्यांनी तळमळीने अभ्यासला. बांधकाम साहित्यांच्या किमतीमध्ये बचत करून स्वस्त घरबांधणीच्या तंत्रात सुधारणा केल्या. स्थानिक बांधकाम साहित्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या धोरणावर भर देऊन स्वस्त घरबांधणीचे प्रयोगही त्यांनी काही ठिकाणी केले. बडोदा सिटिझन्स कौन्सिलची स्थापना करून त्या स्थानिक लोकांना व संस्थांना स्वस्त घरबांधणीच्या प्रयोगामध्ये सामील केले.

१९७४ साली त्यांना फोर्ड फाउंडेशनने अनुदान देऊन दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर पाठवले. ‘लो कॉस्ट हाउसिंग’ या विषयावर त्या दौऱ्यामध्ये त्यांनी बरीचशी माहिती जमा केली. हाउसिंग-एज्युकेशन-अ‍ॅक्शन-रिसर्च-ट्रेनिंग हार्ट नावाने त्यांनी एक विभाग कार्यान्वित केला. त्यासाठी युनिसेफ, ऑक्सफॅम या संस्थांकडून आर्थिक मदतीची सोय केली. त्यामुळे विभागातर्फे दोन संशोधन प्रकल्प व एक कृती प्रकल्प त्यांना हाती घेता आले.

१९८० साली आचवलांचा अकाली मृत्यू झाला. त्यांनतर आठ वर्षांनी, म्हणजे १९८८ सालापासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स या संस्थेने माधव आचवलांच्या नावाने दरवर्षी सुवर्णपदक द्यायला सुरुवात केली. वास्तुशिल्पकलेच्या शैक्षणिक क्षेत्रात अथवा सामाजिक क्षेत्रात ज्या वास्तुशिल्पकाराने भरीव योगदान दिले असेल, त्याला हे पदक दिले जाते.आचवलांनी लक्षणीय ललित आणि समीक्षा लेखनही केलेले आहे.

        - भास्कर द. साठे

 

आचवल, माधव भास्कर