Skip to main content
x

अत्रे,प्रल्हाद केशव

पल्या सहज विनोदनिर्मितीने मराठीत सर्वांत लोकप्रिय विनोदकार प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडच्या कोटीन या गावी झाला. १९११ मध्ये अत्रे पुण्याला आले व त्यांचे पुढील शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमध्ये झाले. पुण्यातील तत्कालीन वाङ्मय जगताने अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळेच वळण दिले. १९१२ साली राम गणेश गडकरी यांच्याशी अत्र्यांची भेट झाली. या भेटीचा व त्यानंतर गडकऱ्यांशी आलेल्या संबंधाचा अत्रे यांच्या साहित्यावर बराच प्रभाव गडचाप्रमाणेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, नारायण वामन टिळक, बालकवी ठोंबरे इत्यादिकांशी त्यांचा परिचय झाला. केशवसुत, गोविंदाग्रज व बालकवी यांच्या कवितेने ते झपाटले गेले. त्यामुळेच त्यांच्या हातून काव्यरचना घडली.

आपल्या असामान्य लेखनकर्तृत्वाने अत्रे यांनी नाटक, काव्य, पाठ्यपुस्तक निर्मिती, व्यक्तिप्रधान लेखन, विनोदी लेखन, विनोदी कथा, चित्रपट कथा अशा साहित्याच्या क्षेत्रांत अस्सल मराठी वळणाचे सुंदर, प्रासादिक व खुमासदार लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून तर मान्यता मिळवलीच, शिवाय आपल्या निर्मितीने नाटकांत व विनोदांत अपूर्व असे मानदंड निर्माण केले. त्यांच्या एकंदर साहित्यनिर्मितीची केवळ नोंदही प्रचंड ठरेल. ‘अकरावा अवतार’ (१९२०), ‘झेंडूची फुले’ (१९२५), ‘गीतगंगा’ (१९३५), ‘पंचगव्य’ (दत्तू बांदेकरांच्या सहकार्याने १९५८) हे कवितासंग्रह;  ‘संगीत गुरुदक्षिणा’ (१९३०), ‘संगीत वीरवचन’(१९३२), ‘साष्टांग नमस्कार’ (१९३३), ‘घराबाहेर’ (१९३३), ‘भ्रमाचा भोपळा’ (१९३५), ‘उद्याचा संसार’ (१९३६), ‘लग्नाची बेडी’ (१९३६), ‘वंदे मातरम्’ (१९३७), ‘पराचा कावळा’ (१९३८), ‘मी उभा आहे’ (१९३९), ‘जग काय म्हणेल?’ (१९४६), ‘पाणिग्रहण’ (१९४६), ‘कवडीचुंबक’ (१९५१), ‘एकच प्याला’ (गडकर्‍यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकाचे विडंबन, १९५३), ‘वसंतसेना’ (१९५८), ‘मोरूची मावशी’ (१९६३), ‘बुवा तेथे बाया’ (१९६४), ‘तो मी नव्हेच’ (१९६५), ‘मी मंत्री झालो’ (१९६६), ‘डॉक्टर लागू’ (१९६७), ‘प्रीतिसंगम’ (१९६८), ‘ब्रह्मचारी’ (१९६९), ‘अशी बायको हवी’ (१९६९), ‘सम्राट सिंह’ (शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’चा अनुवाद, १९७३), ‘साखरपुडा’ (१९४२), ‘ब्रँडीची बाटली’ (१९४४), ‘वामकुक्षी’ (१९४९), ‘बत्ताशी आणि इतर कथा’ (१९५४), ‘हास्यकथा’ (भाग १, १९५८), ‘हास्यकथा’ (भाग २, १९५९) हे कथासंग्रह; ‘महाराष्ट्र मोहरा’ (१९१४), ‘मोहित्यांचा शाप’ (१९२१), ‘चांगुणा’ (१९५४) या कादंबर्‍या; ‘मी कसा झालो?’ (१९५३), ‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मवृत्तात्मक लेखन; ‘चित्रकथा’  (भाग ११ : १९५९) हा चित्रपट कथासंग्रह; ‘अत्रे उवाच’ (१९३७-१९४२), ‘स्वराज्याचा अरुणोदय’ (१९४६), ‘पत्रकार अत्रे’ (१९५३), ‘सूर्यास्त’ (१९६४), ‘सुभाषकथा’ (१९६४), ‘इतका लहान - इतका महान’ (१९६६), ‘समाधीवरील अश्रू’ (१९६९), ‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी’ (१९७३), ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर’ (१९८३) ‘गडकरी सर्वस्व’ (१९८४), ‘मी अत्रे बोलतोय’ (१९९६) आदी लेखसंग्रहआणि सुमारे पन्नास पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना असा अत्रे यांचा विपुल साहित्यसंभार आहे.

आपले लेखन करताना अत्रे यांनी काही वेळा ‘मकरंद’, ‘केशवकुमार’, ‘आनंदकुमार’, ‘आत्रेय’, ‘घारूअण्णा घोडनदीकर’, ‘सत्यहृदय’, ‘प्रभाकर’, ‘साहित्य फौजदार’, ‘वायुपुत्र’, ‘काकाकुवा’, ‘अस्सल धुळेकर’, ‘निकटवर्ती’, ‘जमदग्नी’, ‘महाराष्ट्र सेवक’ इत्यादी टोपणनावे उपयोगात आणली आहेत. आधुनिक महाराष्ट्रात इतके विविधांगी कर्तृत्व दाखविणारा दुसरा लेखक सांगणे अतिशय अवघड आहे. ही सर्व कामगिरी लक्षात घेऊनच ‘आचार्य अत्रे, एक खरीखुरी अतिशयोक्ती’ असे गंगाधर गाडगीळ यांना म्हणावेसे वाटले आहे. विनोदी लेखक आाणि वक्ता म्हणून महाराष्ट्रात अत्र्यांना जेवढी लोकप्रियता लाभली, तेवढी दुसऱ्या कोणाच्याही वाट्याला आली नाही. अत्रे यांच्या लेखणीचा प्राणभूत घटक म्हणजे विनोद; तो पंडिती वा कोटिबाज नाही. मानवी वर्तनातील व स्वभावातील विसंगती टिपणारा, काही वेळा बोचकारणारा, बाष्कळ, उच्छृंखल व क्वचित शिवराळ आहे. परंतु त्यातील ताजेपणा व उत्स्फूर्तता मराठीतील दुसऱ्या कुठल्याच विनोदकारामध्ये आढळत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील धाडस व आक्रमकता यांचा त्यांच्या साहित्यातही आविष्कार घडतो आणि तोच त्यांच्या साहित्याला वेगळेपणा बहाल करतो.

१९४२ साली नाशिक येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात त्यांनी अनेक विषयांविषयी विचार मांडले. त्यांत त्यांनी विनोदाविषयीही आपले मतप्रतिपादन केले आहे. ते म्हणतात, “मानवी जीवनात रोग, जरा, मरण, अपघात, हानी, पराभव, निराशा, अपमान, अज्ञान, मूर्खपणा अशी अनंत दुःखे भरलेली आहेत. ह्या दुःखांकडे गांभीर्याने पाहिल्यास ती दुणावल्याखेरीज राहणार नाहीत. म्हणून त्यांच्याकडे खेळकर दृष्टीने बघून जीवन सुखावह करण्यासाठी मनुष्याला विनोदाची देणगी मिळालेली आहे. विविध प्रकारचे दुःख हा विनोदाचा एकमेव विषय आहे. समाजातील अनिष्ट रूढी आाणि सवयी नाहीशा करावयाच्या असतील, तर त्यांच्यामधील अनिष्टपणा आाणि निरर्थकता हे विनोदाच्या साहाय्याने समाजापुढे उघडे करून दाखविले पाहिजे.” त्यांची हीच विनोदविषयक दृष्टी त्यांच्या साहित्यनिर्मितीतूनही प्रकटली आहे.

‘झेंडूची फुले’ हा अत्रे यांचा अजरामर ठरलेला विडंबन कवितासंग्रह म्हणजे रविकिरण मंडळाची कवितेच्या अंगाने काव्यभाषेत केलेली समीक्षा आहे.‘मी कसा झालो’ हे अत्रे यांचे आत्मचरित्रात्मक लेखन १९५३ पर्यंतच्या काळातील अत्र्यांच्या जीवनाचे प्रत्ययकारी व नाट्यपूर्ण असे दर्शन घडविते.‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रात्मक खंडांतून त्यांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन स्वरूपाचा धावता आलेख रेखाटला आहे. सामान्य माणूस मोठी कामगिरी कशी करू शकतो, हे वाचकांच्या मनावर ठसविण्यासाठी त्यांनी हे लेखन केले आहे. त्यांच्या ठायी असणारे सामर्थ्य आणि काय हवे, काय नको; ते रोखठोकपणे सांगणारी पारदर्शी शैली प्रकटते. ‘फुलांची ओंजळ’, ‘बहिणाबाई चौधरी यांच्या कविता’, दि.वि. देव संपादित ‘उपहासिनी’ या काव्यसंग्रहाची प्रस्तावना, ‘संपूर्ण गडकरी’ व ‘अप्रकाशित गडकरी’ या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना यादृष्टीने विशेष उल्लेखनीय ठरतात.

            ‘गुत्त्यात नारद’, ‘ब्रँडीची बाटली’, ‘बाजारात तुरी’, ‘सार्वजनिक जीवन’, ‘पहिले कावळे संमेलन’, ‘गांधीवादी पाहुणे’ यांसारख्या त्यांच्या विनोदी कथा, कथेचा प्रकृतिधर्म सांभाळणार्‍या आहेत. वेधक आरंभ, कृतिप्रधान प्रसंग, पृथगात्म पात्रनिर्मिती, चित्रदर्शी मांडणी, प्रसंगनिष्ठ व शब्दनिष्ठ विनोदातील सहजता व कलाटणीपूर्ण अंत अशा स्वरूपात अत्रे यांच्या कथा साकार होतात. अत्रे यांनी केलेले व्यक्तिगौरवप्रधान लेखन मराठी साहित्येतिहासात अपवादाभूत म्हणावे लागेल. साने गुरुजी, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि अनेकानेक थोर मराठी संत यांचा अत्रे यांनी केलेला गुणगौरव म्हणजे विलोभनीय शब्दप्रभुत्वाचा सहजोद्रेक म्हणता येईल. पत्रकारिता हे अत्रे यांच्या कर्तृत्वाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. याखेरीज संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्रे यांनी बजावलेली भूमिका तर केवळ अविस्मरणीय होय.

           - प्रा. डॉ. विलास खोले

अत्रे,प्रल्हाद केशव