Skip to main content
x

दिवाण, अश्विनीकुमार के

           हिमाचल प्रदेश येथील शिमला या शहरात अश्विनीकुमार के दिवाण यांचा जन्म झाला. त्यांचे वडील के.एल.दिवाण हे पुढे अहमदनगर येथे स्थायिक झाले. दि. ४ डिसेंबर १९५४ या दिवशी अश्विनीकुमार लष्कराच्या सेवेत दाखल झाले. भारताच्या उत्तर सीमेकडील चूशूल या क्षेत्रातील गुरुंग हिल या भागात दि. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी चीनने हल्ला केला. चीनने मोठ्या ताकदीनिशी खूप सैन्य व दारूगोळ्यासह पद्धतशीर रितीने या भागावर मोठा हल्ला चढवला.
      कॅप्टन अश्विनीकुमार दिवाण हे आपल्या रणगाड्यासह आपल्या पायदळाला शत्रूचा हल्ला परतवण्यासाठी मदत करत होते. ते स्वतः एका उघड्या वाहनात बसून आपल्या रणगाड्यांना मोठा धक्का पत्करूनपुढे नेत होते. उघड्या वाहनामुळे दृष्यमानता स्पष्ट होती आणि त्यात मोठा धोकाही होता. स्वतःच्या जिवाची कोणतीही फिकीर न बाळगता अश्विनीकुमार यांनी आपल्या रणगाड्यांच्या हल्ल्याचे व गोळीबाराचे संयोजन केले. व शत्रूची मोठी जीवितहानी घडवून आणली. त्याशिवाय तोफगोळ्यांचा सतत मारा करून त्यांनी आपल्यापुढे गेलेल्या पायदळातील जवानांना शत्रूच्या तावडीतून सहीसलामत परत येण्यास मदत केली. कॅप्टन अश्विनीकुमार दिवाण यांच्या विशेष धैर्य व कार्याप्रती निष्ठेसाठी त्यांचा ‘वीरचक्र’ देऊन गौरव करण्यात आला. अश्विनीकुमार लष्करातून ‘मेजर जनरल या पदावरून निवृत्त झाले.
-संपादित

दिवाण, अश्विनीकुमार के