आगाशे, गणेश जनार्दन
आगाशे यांचे मूळ गाव रत्नागिरी जवळ ‘कोळंबे’ हे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण आळंदी व सासवड येथे झाले. येथील सरकारी हायस्कूलमध्ये बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचे कौतुक होते. १८६९ साली मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. डेक्कन महाविद्यालयामध्ये त्यांनी बी.ए.चे शिक्षण घेतले. त्या परीक्षेत त्यांना भगवानदास पुरुषोत्तम शिष्यवृत्ती मिळाली. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत ते प्रथम क्रमांकावर होते.
‘अर्थशास्त्र’ हा त्यांचा विशेष आवडता विषय होता.‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’(मिसेस फॉसेटकृत इंग्रजी ग्रंथाच्या आधारे स्वैर रूपांतर) १८९१ मध्ये लिहिले. अर्थशास्त्र विवेचनास कोणतीही परिभाषा हाताशी नसताना त्यांनी हा ग्रंथ दक्षतापूर्वक लिहिला. या ग्रंथाला दक्षिणा प्राइझ कमिटीचा विशेष पुरस्कार मिळाला.
आगाशे हे विद्याव्यासंगी व बहुश्रुत होते. अभ्यास, चिंतन व मनन करणे ही त्यांची वृत्ती होती. पुणे, ठाणे, नगर, धुळे इत्यादी ठिकाणी त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. निवृत्तीपूर्वी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक या पदांवरही काम केले. निवृत्तीनंतर काही काळ डेक्कन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून सरकारकडून नेमणूक झाली होती.
आगाशे हे शीघ्र कवी होते. मराठी, संस्कृत, इंग्रजी ह्या भाषांत ते सहज कविता करत असत. त्यांच्या कविता तत्कालीन ‘विविधज्ञानविस्तार’, ‘काव्यरत्नावलि’ अशा नियतकालिकांत प्रसिद्ध होत. समकालीन व उत्तरकालीन काव्यसमीक्षकांनी आगाशेंच्या काव्याची दखल घेतली. ‘बिरुदावली’ (१९०१) आणि ‘राज्यारोहण’ (१९१२) ही त्यांची विशेष काव्ये होत. यांतील ‘बिरुदावली’ ही कविता त्यांचे गुरू न्यायमूर्ती रावसाहेब रानडे यांच्यावर केलेली आहे. स्वत:च्या मुलाच्या मृत्यूमुळे आगाशेंनी ‘बाष्पांजली’ (१९१६) काव्य लिहिले. या काव्यसंग्रहाची समीक्षा करताना समीक्षकांनी हे काव्य म्हणजे सरस, नवीन वळणाचे व अत्यंत प्रभावी असल्याचे म्हटले आहे. या ३३५ श्लोकांच्या काव्यातून आगाशेंनी अकाली मृत्यू आलेल्या आपल्या मुलाशी भावोत्कट संवाद साधला आहे.
‘सुंदरेची संक्रांत’, ‘सद्गुणमंजरी’, ‘राज्यारोहण’, ‘तीन हरिभाऊ’, ‘एडवर्ड बादशहा’, ‘यंदाचा हिवाळा’ इत्यादी कवितांप्रमाणे ‘उपनिषदे’, ‘भगवद्गीता’, ‘अजविलाप’, ‘इनमेमोरियम’ या काव्यात आत्म्याच्या मरणोत्तर गतीविषयी आलेल्या कल्पनांचा उपयोग केला आहे. तत्कालीन नवशिक्षितांमधील सरकारदरबारी व सुशिक्षितांच्या मेळाव्यात आगाशे हे मान्यता पावलेले कवी होते.
मराठीतील प्रारंभकालीन ‘अर्थशास्त्रीय लेखक’ म्हणूनही आगाशेंची कीर्ती झाली. ‘अर्थशास्त्र वाचन पाठमाला’ या शीर्षकाखाली त्यांचे काही संवादात्मक लेख ‘विविधज्ञानविस्तार’मधून प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या शिक्षणविषयक व्यासंगात बालशिक्षणालाही त्यांनी महत्त्व दिले. त्याविषयीचे त्यांचे लेख तत्कालीन नियतकालिकांतून प्रसिद्ध होत.
‘महाराष्ट्र वाङ्मयाचे पर्यालोचन’ (१९०२) आणि ‘महाराष्ट्र वाङ्मय’ (१९०३) हे त्यांचे निबंध उल्लेखनीय होते. निबंधकार, टीकाकार असलेले आगाशे यांनी इंदूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९१७) भूषविले. तत्कालीन साहित्यव्यवहार, ग्रंथनिर्मिती, भाषाव्यवहार याबद्दल विद्वत्तापूर्ण भाषण करून साहित्यविचाराला प्रेरणा दिली आणि मार्गदर्शन केले यांबद्दल आगाशे यांची साहित्यप्रांतात वाहवा झाली.