Skip to main content
x

कामत, अशोक प्रभाकर

हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये एम.ए.,  पीएच.डी. आणि विपुल ग्रंथलेखन करणार्‍या बोटावर मोजण्याएवढ्या मराठी लेखकांमध्ये डॉ.अशोक कामत हे एक प्रमुख लेखक आहेत. पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे कार्य करून ते निवृत्त झालेले आहेत. ‘महाराष्ट्र के नाथपंथिय कवियोंका हिंदी काव्य’  या विषयावर त्यांनी हिंदीत प्रबंध लिहून पीएच.डी. पदवी मिळविलेली आहे. त्यांना डॉ.न.चिं. जोगळेकर यांचे गाइड म्हणून मार्गदर्शन लाभले. मथुरा येथील जवाहर पुस्तकालयाने हा प्रबंध ग्रंथरूपाने (१९७६) प्रकाशित केला आहे. डॉ. कामत यांनी ‘नामदेवांचे जीवन व त्यांचे हिंदी मराठी काव्य यांचा पुनर्विचार’ या विषयावर मराठीत प्रबंध लिहिला व १९८४ साली दुसरी पीएच.डी. पदवी संपादन केली.

डॉ. कामत यांची ‘संत रोहिदास’ (१९६६), ‘आपला देश आपली माणसे’, ‘कबीर (१९६८) नॅशनल बुक ट्रस्ट, ‘स्वामी म्हणे माझा नाथसंप्रदाय, ‘श्री नामदेव: एक विजययात्रा’ (१९७०), ‘ज्ञानदेव भगिनी मुक्ताबाई’, ‘गोस्वामी तुलसीदास’ (१९७८), ‘संत आणि समाज’, ‘सुभाषमय दिवस’, ‘संत कथा’, ‘संत नामदेव आणि गुरु नानकदेव’, ‘सिक्ख गुरुचरित्र’ (२ खंड), ‘संत नामदेव आणि संंत एकनाथ’, ‘पसायदान’, ‘शाहू महाराज’, ‘मातृहृदयी सानेगुरुजी’, ‘शिवविचार, ‘ऐसी हे समर्थ पदवी’ (गोकुळ मासिक प्रकाशन), ‘भक्त भारती’, ‘महात्मा बसवेश्वर’ (सत्संग प्रतिष्ठान), ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ (गोकुळ  मासिक प्रकाशन) अशी साहित्यसंपदा आहे.

स्वतंत्र ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथांचे स्वतंत्र व सहयोग्यांसह संपादन केलेले आहे. ‘वीरशैव संतसाहित्य’, ‘मना सज्जना’, ‘एक तरी ओवी अनुभवावी’, ‘संत एकनाथ : एक समग्र अभ्यास’ हे त्यांपैकी काही प्रमुख ग्रंथ आहेत. त्याशिवाय संत लक्ष्मण महाराजांसह अनेक संतांच्या अभंग गाथांचे त्यांनी संशोधन संपादन व प्रकाशन केलेले आहे. 

डॉ. कामत यांचे हिंदीत ‘मानपुरी पदावली’ (१९६६), ‘भक्तकवी ठाकूर’ (१९६७), ‘महाराष्ट्र के नाथपंथिय कवियोंका हिंदी काव्य’(१९७६), ‘आचार्य दामोदर पंडित’ (१९७६), (प्रकाशक :जवाहर पुस्तकालय मथुरा), ‘समर्थ रामदास’ (१९८८), ‘महायात्री नामदेव’, ‘महाराष्ट्र और राष्ट्रभाषा’, ‘जीवनधारा’ हे प्रमुख ग्रंथ असून इतर अनेक छोटी संपादने व प्रासंगिक स्फुट लेखन (२०० लेख) त्यांच्या नावावर आहे.

डॉ. कामत यांच्या ग्रंथांना भारत सरकार अहिंदी लेखक पुरस्कार, कुमार साहित्य पुरस्कार, राष्ट्रमित्र पुरस्कार, वि.भि. कोलते पुरस्कार, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार, यासह असंख्य प्रतिष्ठित व मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. २०१८ साली त्यांना उत्तर प्रदेश शासनाचा सौहार्द पुरस्कार मिळाला आहे. 

कामत यांनी ‘गुरुकुल प्रतिष्ठान न्यास’या संस्थेची स्थापना केली असून त्याद्वारे कमी किंमतीत वाचकांना पुस्तके उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत नामदेव अध्यासनात २०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी संशोधन-प्रबंध लेखन करून पदवी संपादन केलेली आहे व ७०पेक्षा अधिक प्रबंधिका लिहिल्या गेल्या आहेत. सतत अध्ययन व लेखन हेच त्यांचे जीवन आहे. त्यामुळे हा परिचय प्रकाशित होईपर्यंत त्यांच्या नावावर आणखी काही ग्रंथांची नोंद होईल अशी त्यांची लेखनगती आहे.

हिंदी पाठ्य पुस्तक समिती (महाराष्ट्र राज्य पाठ्य पुरस्कार), महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय श्रीराम कोश मंडळ; भारतीय विद्याभवन महाविद्यालयीन समिती, महाराष्ट्र राष्ट्रसभा सभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मराठी परीक्षा समिती अशा अनेक समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. सध्या ते ‘सत्संग प्रतिष्ठान’द्वारे संतसाहित्य प्रचाराचे कार्य करीत आहेत.

- विद्याधर ताठे

 

कामत, अशोक प्रभाकर