Skip to main content
x

कोरटकर, केशव संतुकराव

     केशव संतुकराव कोरटकर यांचा जन्म १८६७ साली  परभणी जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील पुरजळ या गावी  झाला. १८९०मध्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रारंभी पाच-सहा वर्षे गुलबर्गा येथे त्यांनी वकिली केली. १८९३ पासून ते हैदराबाद येथे उच्च न्यायालयात वकिली करू लागले. नंतरच्या काळात केशवराव आणि त्यांचे स्नेही वामन नाईक यांनी हैदराबाद संस्थानातील सार्वजनिक जीवनाचे नेतृत्व केले. संस्थानात राजकीय चळवळीला आणि राजकीय संस्था स्थापन करण्याला बंदी असल्यामुळे, शिक्षणसंस्था, ग्रंथालये, धार्मिक चळवळी आणि नियतकालिकांची आणि ग्रंथांची प्रकाशने हीच लोकजागृतीची साधने होती. या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देणार्‍यांत केशवराव कोरटकर प्रमुख होते.

     नांदेड जिल्ह्यातल्या कुबेर गावात जलालशहा नावाच्या एका व्यक्तीच्या खुनाबद्दल त्र्यंबकराव आणि यशवंतराव देशमुख यांच्यावर झालेल्या खटल्यात कोरटकरांनी सर तेजबहादूर सप्रू यांच्याबरोबर बचावाचे एक वकील म्हणून काम केले. उच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी चालविले. बहुतेक मुस्लिम न्यायाधीश असलेल्या या उच्च न्यायालयात एक हिंदू न्यायाधीश नेमण्याचा प्रघात पडला होता. राय बालमुकुंद यांच्या सेवानिवृत्तीनंतर उच्च न्यायालयात रिकाम्या झालेल्या त्या जागेवर केशवरावांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून १९२१साली नियुक्ती झाली. ऑगस्ट १९२४मध्ये गुलबर्ग्यात झालेल्या हिंदु-मुस्लिम दंग्याची चौकशी करणार्‍या आयोगाचे ते अध्यक्ष होते. १९२६मध्ये ते निवृत्त झाले.

    अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काही अधिवेशनांना ते उपस्थित राहिले. हिंदू सेवकसमाज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, भारत इतिहास संशोधक मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी संस्थानाबाहेरच्या महाराष्ट्रातील  प्रमुख सांस्कृतिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेपासून केशवराव त्याच्याशी निगडित होते. हैदराबाद संस्थानात वेगळी साहित्य संस्था स्थापन करणे अवघड असल्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्षेत्रात हैदराबाद संस्थानातील मराठी भागाचा समावेश करण्यात आला होता. अमरावती येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९०७साली विवेकवर्धिनी या हैदराबाद शहरातील प्रमुख शिक्षण संस्थेची स्थापना करणार्‍यांत केशवराव कोरटकर एक होते.

     ‘हैदराबाद संस्थान सामाजिक परिषद’ या नावाने दरवर्षी अधिवेशन भरवून सामाजिक  प्रश्नांचा ऊहापोह करण्याचा उपक्रम काही वर्षे चालला. त्यातील हदगाव जि. नांदेड येथे १९१९साली भरलेल्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्षपद केशवरावांनी भूषविले होते, तर हैदराबादेत भरलेल्या चौथ्या अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. आपल्या प्रजेत धर्माच्या आधारावर भेदभाव करणे हे हैदराबादच्या निजामी राजवटीच्या धोरणाचे एक अंग होते. संस्थानात ‘आर्य समाज’ स्थापन झाल्यानंतर धार्मिक जुलमाविरुद्ध प्रतिकार होऊ लागला. या चळवळीने हिंदूंना निर्भय बनण्यास साहाय्य केले. आर्य समाजाशी केशवराव कोरटकरांचा विशेष संबंध होता. आर्य समाजाच्या अनेक उपक्रमांचे ते पाठीराखे होते. रँड व आयर्स्ट यांचा खून केल्याचा आरोप असलेल्या चापेकर बंधूंना त्यांनी आर्थिक साहाय्य केल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

     १८९७साली हैदराबाद संस्थानात खूपच मर्यादित अधिकार असलेले  एक  कायदेमंडळ स्थापन झाले होते. सभासदांची नियुक्ती सरकारच करीत असे. या कायदेमंडळाचे सभासद म्हणूनही कोरटकरांनी काम केले. विधवाविवाहापासून झालेली संतती औरस समजली जावी यासाठी, त्याचप्रमाणे हैदराबादच्या कायद्यात बलात्काराच्या व्याख्येत संमतीवयाचा उल्लेख करण्यासाठीचे बिलही त्यांनी मांडले होते.

     २१ मे १९३२ रोजी पुणे येथे मधुमेहाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. केशव मेमोरियल हायस्कूल या नावाची एक शाळा हैदराबादेत त्यांच्या स्मृत्यर्थ उभी आहे.

- न्या.नरेंद्र चपळगावकर

कोरटकर, केशव संतुकराव