Skip to main content
x

नानावटी, रुस्तुम कैखुश्रू

      रुस्तुम कैखुश्रू नानावटी यांचा जन्म पूर्वीच्या मुंबई इलाख्यात कारवार येथे (उत्तर कर्नाटक जिल्हा) झाला. त्यांचे वडील के.जे.नानावटी हे मुंबई इलाख्यातील प्रख्यात आणि कर्तबगार पोलिस महानिरीक्षक होते. त्यांची आई धन नानावटी ह्या मूळच्या ‘राजपिपला’ ह्या गुजरातमधल्या संस्थानात वाढल्या होत्या. धनजीशा एडलजी कोठावाला हे तिथले दिवाण म्हणजे त्यांच्या आईचे आजोबा. थोडक्यात, प्रशासनात महत्त्वाची जागा भूषवण्याचा वारसा त्यांना माता-पिता, दोन्हींकडून मिळाला होता 

     नानावटी यांचे शालेय शिक्षण पाचगणीच्या सेंट पीटर्स हायस्कूलमध्ये  झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण राजकोट येथील राजकुमार  महाविद्यालयामधून आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले.

     परंतु नानावटी यांचे मन शिक्षणात रमले नव्हते. लहानपणापासून त्यांना सैनिकी पेशाचे आकर्षण वाटत होते. किंबहुना तेच त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे जिथे साहस, थरार, शौर्य ह्यांची गरज आहे, अशा जगात ते रमायचे. ते स्वत: उमदे खेळाडू होते. बॉक्सिंग, हॉकी, फुटबॉल या खेळांमध्ये ते तरबेज होते. त्यांचे खेळाचे शिक्षक पीटर रॉजरसन ह्यांच्या तालमीत ते तयार झाले.

     १९६१मध्ये त्यांनी डेहराडून येथील भारतीय सैनिकी प्रबोधिनीत एकतिसाव्या तुकडीत प्रवेश घेतला. ड्रील, कवायत, मार्क्समनशिप, डावपेच आणि नेतृत्वगुण ह्या सगळ्यांत विलक्षण प्रावीण्य दाखवत ‘बेस्ट ऑलराउण्ड कॅडेट’ असा बहुमान त्यांनी मिळवला. दि.११ डिसेंबर १९६२, रोजी ते आठव्या गोरखा पलटणीच्या दुसर्‍या तुकडीत सामील झाले. महू येथील ‘इन्फन्ट्री स्कूल’मध्ये १९६५ साली त्यांनी शस्त्रास्त्र प्रशिक्षणात बंदूक चालवताना नेमबाजीत विक्रम प्रस्थापित केला. ह्याच विषयातील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यात ‘फोर्ट  बेनिंग’ येथील ‘इन्फन्ट्री ऑफिसर्स अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स’मध्ये त्यांना सर्वोच्च श्रेणी मिळाली. तसेच ‘डिस्टिंग्विश्ड अलाइड ग्रॅजुएट’ म्हणून त्यांना गौरवण्यात आले. ‘डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज’ आणि दिल्लीतील ‘नॅशनल डिफेन्स स्कूल’ येथूनही त्यांनी प्रशिक्षण घेतले. प्रस्तरारोहण, नौकानयन, भूमीगत बंकर्समधील चढाई असे प्रशिक्षणही त्यांनी घेतले.

     ‘पहिल्या आर्मर्ड ब्रिगेड’मध्ये ‘ब्रिगेड मेजर’ म्हणून काम केल्यानंतर १९७९मध्ये त्यांनी त्याच बटालियनची सूत्रे हाती घेतली. पंजाब, प.बंगाल, तसेच भूतान येथे त्या काळात त्यांनी काम केले. १९८२ ते १९८५ ह्या कालावधीत ते वॉरमिन्स्टर येथील ‘ब्रिटिश आर्मी स्कूल ऑफ इन्फन्ट्री’ येथे भारतीय सैन्यदलाचे समन्वयक म्हणून कार्यरत होते.

     १९८७मध्ये श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेच्या कामात ते सहभागी झाले होते. ‘ऑपरेशन पवन’मध्ये ‘पॅराशूट कमांडो टास्क फोर्स’ मध्ये ते कार्यरत होते.

     भारतात परत आल्यावर त्यांना ‘ब्रिगेडियर’ पदावर बढती मिळाली. लगेचच ‘ऑपरेशन मेघदूत’ ह्या महत्त्वाच्या मोहिमेवर ते सियाचेनमधल्या बर्फाळ भागात रुजू झाले. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक हवामानात युद्धसदृश परिस्थितीत सुमारे अडीच वर्षे काम केल्याबद्दल दि.२० एप्रिल १९९१ रोजी ‘उत्तम युद्ध सेवा पदक’ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला.

     मेजर जनरल’ ह्या पदावर असताना त्यांनी अशांत काश्मीर भागाची जबाबदारी स्वीकारली. १९९३मध्ये तेथे पार पडलेल्या ‘ऑपरेशन रक्षक’ या मोहिमेत एकोणिसाव्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे नेतृत्व करताना त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. नियंत्रण रेषेजवळ अनेक अतिरेक्यांंना त्यांनी कंठस्नान घातले. या पराक्रमाबद्दल त्यांना १९९६मध्ये ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरवण्यात आले.

     नानावटी ह्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पदोन्नतीसोबत त्यांनी नवे आव्हान स्वीकारले. ‘लेफ्टनंट जनरल’ पदाची सूत्रे हातात घेतल्याबरोबर नागालॅण्ड, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाम ह्या राज्यांमध्ये सीमावर्ती भागातून येणार्‍या घुसखोरांच्या अतिरेकी कारवायांना आळा घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ‘ऑपरेशन ऑर्चिड’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ मधील कामगिरीसाठी १९९९मध्ये त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देण्यात आले.

     ईशान्येकडील राज्यांमधून परत आल्यानंतर त्यांची विनंती लक्षात घेऊन पुन्हा एकदा त्यांना अशांत काश्मीर राज्यात पाठवण्यात आले. सुरुवातीला ते ‘चीफ ऑफ स्टाफ’ होते. ‘जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ म्हणूनही त्यांनी काम केले. ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन पराक्रम’ ह्या मोहिमा त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवण्यात आल्या.

     जेथून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली, त्या आठव्या गोरखा रेजिमेंटचे आधी कर्नल, नंतर संपूर्ण ‘गोरखा ब्रिगेड’चे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. दि.१ जून २००३ रोजी ते निवृत्त झाले.

     त्यानंतर दि.१ सप्टेंबर २००७ ते दि.३१ ऑगस्ट २००९ ही दोन वर्षे पुणे विद्यापीठाच्या संरक्षण शास्त्र विभागात ‘छत्रपती शिवाजी अध्यासना’चे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

     सध्या ‘भारतातील अंतर्गत शस्त्रसंघर्ष’ ह्या विषयावरील शोधनिबंध लेखनात ते मग्न आहेत. एकेकाळी उत्कृष्ट शिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सध्या ते वन्यजीव, तसेच पर्यावरणाच्या रक्षणाच्या कामात सक्रिय आहेत.

- गीतांजली वैशंपायन

नानावटी, रुस्तुम कैखुश्रू