Skip to main content
x

कर्वे, चिंतामण श्रीधर

     डॉ.चिंतामण श्रीधर कर्वे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुण्याचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय, मुंबईचे रुइया महाविद्यालय आणि खालसा महाविद्यालय येथे भौतिकशास्त्र अध्यापनाचे काम केले. काही वर्षे ते खालसा महाविद्यालयाचे प्राचार्यही होते. ते एक लोकप्रिय, कार्यक्षम आणि प्रभावी प्राध्यापक होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रा. शहा यांच्यासोबत लिहिलेली भौतिकशास्त्रावरील पुस्तके दोन तपे लोकप्रिय होती. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे ते वीस वर्षांहून अधिक काळ सभासद होते. विद्यापीठाचे ते फेलोही होते. विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचे व्याख्याते म्हणून ते बाहेरगावी जाऊन भाषणे देत.

     प्राचार्य डॉ.कर्वे हे विज्ञान प्रसारकांच्या पहिल्या पिढीतील एक धडाडीचे कार्यकर्ते होते. विज्ञानाच्या अनेक विषयांवर वर्तमानपत्रे, मासिके यांत लेख लिहिणे, विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्या-त्या वेळी प्रचलित असणाऱ्या विषयांवर पुस्तके लिहिणे, जाहीर भाषणे देणे, आकाशवाणीवर भाषणे, चर्चा, प्रश्‍नोत्तरे यांसारखे कार्यक्रम करणे यांत डॉ.कर्वे अखंडपणे गुंतलेले असत. त्यांनी विज्ञानावर विसाहून अधिक पुस्तके लिहिली. ‘निळे आकाश’, ‘मानवाचे भवितव्य’, ‘नवविज्ञानाच्या परिसरात’, ‘बालचंद्र’, ‘अणूतून अनंताकडे’, ‘विज्ञान शलाका’, अशी त्यांच्या पुस्तकांची काही शीर्षके आहेत. यांतील काही पुस्तकांच्या दोन-दोन, तीन-तीन आवृत्त्याही निघाल्या आहेत. त्यांना तीनवेळा महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट विज्ञान पुस्तकासाठीचे पुरस्कार मिळाले आहेत. यांतील काही पुस्तके स्वतंत्र, तर काही अनुवादित आहेत; पण त्यांच्या लिखाणाची भाषा सोपी, डौलदार आणि विवरण सुगम असे.

     महाराष्ट्र शासनाच्या परिभाषा समितीवर ते तज्ज्ञ म्हणून काम करीत होते, तर विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभिक समितीचे ते सभासद होते. महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके (भौतिकशास्त्र) समितीचे ते सभासद होते. मराठी विज्ञान परिषदेशी ते स्थापनेपासून निगडित होते. परिषदेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. डॉ.कर्वे यांचा परिषदेच्या १९७१ सालच्या वार्षिक संमेलनात ‘विज्ञान प्रसारक’ म्हणून सन्मानही झाला होता. परिषदेच्या ‘पत्रिके’चे संपादक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले. कोणताही लेख आवश्यक शब्दसंख्येत अत्यंत कमी कालावधीत लिहिण्यात डॉ.कर्वे वाकबगार होते.

     मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. विभागाची स्थापना १९६७ सालची. तेव्हापासून १९८७ सालापर्यंत ते या विभागाचे अध्यक्ष होते. या दरम्यानच्या काळात त्यांनी मराठी विज्ञान परिषदेची दोन वार्षिक संमेलने मोठ्या दिमाखात साजरी केली.

     १९६४ सालापासून ते ठाण्याच्या सरस्वती मंदिर या शाळेच्या ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शेवटची काही वर्षे ते पुण्यात जाऊन राहिले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

- अ. पां. देशपांडे

कर्वे, चिंतामण श्रीधर