Skip to main content
x

मिश्र, वीरेंद्रनाथ

      वीरेंद्रनाथ मिश्र यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फरुकाबाद जिल्ह्यातल्या खंडौली या छोट्या गावात झाला. कानपूरमधून इतिहास विषयात बी.ए. पदवी घेतल्यानंतर ते १९५५मध्ये लखनौला गेले. दरम्यान त्यांनी संस्कृतचेही शिक्षण घेतले होते. लखनौ विद्यापीठातून त्यांनी मानवशास्त्रात १९५७मध्ये एम.ए. ही पदवी संपादन केली. येथे त्यांना विख्यात मानवशास्त्रज्ञ प्रा. डी.एन. मजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले. ते शिक्षणात सदैव अव्वल असत आणि त्यामुळे त्यांना अनेक पारितोषिके मिळाली होती.

     मानवशास्त्राचा अभ्यास करताना मिश्र हे पुरातत्त्वाकडे आकृष्ट झाले होते. लखनौ विद्यापीठात व्याख्याता म्हण्ाून अल्प काळ काम केल्यावर प्रा. डी.एन. मजुमदार यांच्या सल्ल्यानुसार ते या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी १९५८मध्ये पुणे येथे डेक्कन कॉलेजात आले. प्रा. ह.धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९६१मध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली. ‘स्टोन एज कल्चर्स ऑफ राजपुताना’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पीएच.डी.चे काम पूर्ण झाल्यानंतर अगोदर ठरल्याप्रमाणे मिश्र लखनौ विद्यापीठात व्याख्याता या पदावर रुजू झाले.

     तथापि दरम्यान डेक्कन कॉलजमध्ये प्रागितिहास विषयात व्याख्याता पद निर्माण झाले होते. लखनौ विद्यापीठात ठरल्याप्रमाणे एक वर्ष अध्यापन केल्यावर मिश्र पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये आले आणि नंतर १९९५मध्ये ते प्राध्यापकपदावरून निवृत्त झाले. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे संचालक म्हण्ाून २०००मध्ये निवृत्त होईपर्यंत डेक्कन कॉलेजशी त्यांचा संबंध होता. प्रागैतिहासिक व इतिहासपूर्व संस्कृती आणि विविध जमातींच्या लोकजीवनाचा अभ्यास यात प्रा. मिश्र यांना प्रामुख्याने रस होता. त्यांनी १९६२ ते १९६५ या काळात राजस्थानातील उदयपूर, भिलवाडा आणि चितोडगड या भागात सर्वेक्षण केले. या दरम्यान त्यांनी अनेक आद्य पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग या युगांतील पुरास्थळांचा शोध लावला. त्यांनी बारमेर जिल्ह्यातील तिलवाडा आणि भिलवाडा जिल्ह्यातील बागोर येथे उत्खनन केले. नंतरच्या काळात त्यांनी उदयपूर जिल्ह्यातील बालाथल येथे १९९४ ते २००० असे दीर्घकाळ उत्खनन केले. ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्व संशोधनातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण इसवीसनापूर्वी ३७००मध्ये हडप्पाशी संबंध नसलेले, पशुपालन व कृषी यावर उपजीविका असलेले खेडेगाव अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले.

     प्रा. मिश्र यांचे प्रागैतिहासिक संशोधन प्रामुख्याने राजस्थान व मध्य प्रदेश येथील आहे. ते आणि वि.श्री. वाकणकर यांनी मिळून भीमबेटका येथे १९७३ ते १९७७ अशी पाच वर्षे उत्खनन केले. या उत्खननामधून त्यांना ‘अशुलियन’ या प्रागैतिहासिक संस्कृतीपासून ते मध्याश्मयुगापर्यंतचे पुरावशेष मिळाले.

     प्रा. मिश्र आणि त्यांचे सहकारी शरद राजग्ाुरू, ए.के. सिंघवी, ग्ाुरदीप सिंग व डी.पी. अगरवाल यांनी राजस्थानात १९७७ ते १९८३दरम्यान सिंगी तलाव, जायल, सोळा-आर आणि इंदोला की धानी अशा अनेक पुरास्थळांवर संशोधन केले. हा पुरापर्यावरणाच्या अभ्यासातील एक मैलाचा दगड मानला जातो.

     मध्य प्रदेशात १९८६ ते १९९० या काळात नर्मदा नदीच्या खोर्‍यात प्रा. मिश्र आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आद्य पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या कालखंडांमधील पुरास्थळांचा शोध लावला. तसेच त्यांनी नरसिंगपूर जिल्ह्यातील समनापूर या मध्य पुराश्मयुग स्थळाचे उत्खनन केले. भारतातील प्रागैतिहासिक संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेतली जाण्याचे श्रेय प्रा. मिश्र यांना दिले जाते.

     गोंड, पारधी, वनवाघरी, कंजार, काळबेलीया, भिल्ल आणि कुचबंदीया अशा अनेक जमातींच्या लोकजीवनाचा अभ्यास हे प्रा. मिश्र यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना या कामात त्यांच्या सहकारी मालती नागर याची साथ मिळाली. प्रा. मिश्र, मालती नागर आणि एम.एल. के. मूर्ती यांनी मिळून भारतात लोकलक्षी पुरातत्त्व (एींहिरिीलहरशश्रिसिू) या शाखेचा पाया घातला. प्रा. मिश्रांकडे लोकांमध्ये मिसळण्याची विलक्षण कला होती.

     अनेक बोलीभाषांवरील प्रभुत्वामुळे ते सहज गप्पाटप्पा करत आणि मग त्यांना हवी ती माहिती मिळत असे. इतकेच नाही, तर रानात फिरताना भेटलेल्या डाकूंशी अनेकदा बोलून त्यांना पुरातत्त्व म्हणजे काय हे त्यांनी समजावून दिले आहे. प्रस्तुत नोंद करणार्‍या लेखकाने मध्य प्रदेशात लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या त्यांच्या हातोटीचा अनुभव घेतला आहे. मातृभाषा हिंदीखेरीज इंग्लिश, जर्मन, फ्रेंच अशा अनेक भाषा प्रा. मिश्र यांना अवगत होत्या. ते नेहमी मराठी वाचत आणि बोलत. त्यांना हिंदीच्या जवळजवळ सर्व बोलींमध्ये संवाद साधता येत असे. त्यांना लोकसंस्कृतीच्या अभ्यासात त्याचा उपयोग झाला.

     प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनाशिवाय प्रा. मिश्र यांनी पुरातत्त्व आणि मुख्यत: प्रागितिहास या शाखेच्या वाढीसाठी कार्य केले. त्यांनी स्वराज्यप्रकाश ग्ाुप्ता, दिलीप चक्रवर्ती आणि डी.पी. अगरवाल यांच्या मदतीने प्रागितिहास याचा विशेष अभ्यास करण्यासाठी १९७७मध्ये ‘इंडियन सोसायटी फॉर प्रीहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज’ ही संस्था स्थापन केली आणि ‘मॅन अँड एन्व्हरॉनमेन्ट’ हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक सुरू केले. ते गेली चाळीस वर्षे सुरू आहे. सुरुवातीपासून ते त्यांच्या अखेरपर्यंत प्रा. मिश्र यांनी या नियतकालिकाचे संपादन केले. लेखनात आणि संपादनात काटेकोरपणा, दर्जा आणि अचूकता याबाबत ते कमालीचे आग्रही होते.

     एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी प्रा. मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केली. त्यांचे एकशेवीस शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच त्यांनी पाच पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे.

     प्रा. मिश्र यांना अनेक मानसन्मान लाभले. बर्कलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात १९८४ मध्ये ते फुलब्राइट फेलो होते. त्यांचे ग्ाुरू प्रा. डी.एन. मजुमदार यांच्या नावाचे पदक (२००२) मिळवण्याचा मान त्यांना लाभला. ते भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे (खउकठचे) २००० ते २००३ या काळात ते नॅशनल फेलो होते. तसेच २००३ ते २००५ या काळात ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे सुप्रतिष्ठित प्राध्यापक होते. मध्य प्रदेश शासनाने २००७मध्ये वि.श्री. वाकणकर पदकाने त्यांचा सन्मान केला. प्रा. मिश्र यांच्या प्रागितिहासातील योगदानासाठी श्रीलंका सरकारने २०१४मध्ये देरयानिगला पदकाने त्यांचा गौरव केला.

- डॉ. प्रमोद जोगळेकर

मिश्र, वीरेंद्रनाथ