Skip to main content
x

देसाई, गोविंदराव गोपाळ

गोविंदराव गोपाळ देसाई यांचा जन्म कोकणातील नांधवडे या गावी झाला. अण्णासाहेब विजापूरकरांसारखे गुरू मिळाल्याने त्यांची साहित्याची जाण प्रगल्भ झाली आणि पं. विष्णू दिगंबर पलुसकरांकडे संगीताचे शिक्षण घेतल्याने त्यांचे सांगीतिक व्यक्तिमत्त्व प्रभावी झाले. पं. पलुसकरांच्या उपदेशक वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. राष्ट्रीय भावना, नैतिकतेची प्रखर जाणीव असलेले गोविंदराव स्वातंत्र्यलढ्यात खणखणीत स्वरात पोवाडे म्हणून लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करत असत. पारतंत्र्याच्या काळातील हे त्यांचे मोठे कार्य होते.

पं. विष्णू दिगंबरांच्या आदेशानुसार १ जुलै १९१८ रोजी त्यांनी पुण्यात ‘गोपाल गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली. विशेष म्हणजे, पुढे त्यांनी स्वत:च्या वास्तूत हे विद्यालय हलवले तेव्हा ३ एप्रिल १९२७ रोजी विद्यालयाच्या उद्घाटनाला स्वत: महाराज पलुसकर आले होते. गोविंदरावांनी सतत साठ वर्षे या महाविद्यालयात शिकवले.

स्वर हा नेहमी शंभर टक्के सुरेलच लावावा लागतो. स्पष्ट शब्दोच्चार, खुला, मोकळा आवाज यांचे महत्त्व ते पटवून देत. चिजेच्या शब्दांचा अर्थ समजून गायला हवे, असे त्यांचे आग्रही मत होते.

गाण्याचा सराव करताना उजव्या हाताने तंबोरा वाजवून डाव्या हाताने डग्ग्यावर ताल धरावा असे विद्यार्थ्यांना सांगणाऱ्या जुन्या, बुजुर्ग गवयांच्या पिढीतले गोविंदराव हे हाडाचे शिक्षक होते. त्यांचे चिरंजीव हरिभाऊ हे उत्तम संवादिनी वादक होते. त्यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराव गात असत, पुढे ते त्यांच्या विद्यालयाचे प्राचार्य झाले. गोपाळ गायन समाजातील कृष्णाष्टमीचा जलसा, पळणीटकर संगीत स्पर्धा जुन्या काळात विख्यात होत्या. पारतंत्र्याच्या काळात संगीतमेळे व प्रभातफेर्‍या होत असत. त्यात गोपाळ गायन समाजाचा मेळा त्यातील सुरेल पदांसाठी प्रसिद्ध होता. या मेळ्यांतून अनेक होतकरू संगीत कलाकार पुढे आले.

या संस्थेच्या शिष्यशाखेत गजानन वाटवे, कृष्णराव मेहंदळे, यशवंत मराठे, उषा चिपलकट्टी, दुर्गा फळणीकर ही काही ठळक नावे होत. देसाई यांना नव्वद वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य मिळाले व पुण्यातच त्यांचे निधन झाले.

डॉ. सुधा पटवर्धन

देसाई, गोविंदराव गोपाळ