Skip to main content
x

कांबळे, अरुण कृष्णाजी

रगणी (जि. सांगली) येथे जन्मलेल्या अरुण कांबळे यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून बी.ए.व मुंबई विद्यापीठातून एम.ए.केले. प्रथम डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व कीर्ती महाविद्यालय येथे व त्यानंतर मुंबई विद्यापीठ येथे मराठीचे अध्यापन केले. २००२ ते २००५ या काळात ते विद्यापीठात विभाग प्रमुख होते. सध्या ते मुंबई विद्यापीठाच्या फुले-आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत. पदव्युत्तर अध्यापक व पीएच.डी.चे मार्गदर्शक आहेत.

दलित साहित्य अखिल भारतीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर नेण्याचे काम करणे हीच जीवननिष्ठा, असे मानणारे ते धडाडीचे लेखक आणि कवी आहेत. मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही उच्च न्यायालयांनी संशोधन ग्रंथ म्हणून मान्यता दिलेल्या ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’  (१९८२) या ग्रंथांच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. या ग्रंथाचे भाषांतर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत करण्यात आले. ‘जनता पत्रातील लेख’ (१९९३), ‘धर्मांतराची भीमगर्जना’ (१९९६), ‘चीवर’, ‘युगप्रवर्तक डॉ.आंबेडकर’, ‘चळवळींचे दिवस’, ‘वाद-संवाद’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’ (१९८३), तसेच ‘मुद्रा’ (२००८) हे त्यांचे कविता संग्रहही लक्ष्यवेधी ठरले. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू तसेच जर्मन व फ्रेंच या भाषांमध्ये भाषांतरित झाल्या. मिशिगन युनिव्हर्सिटी जर्नलमध्ये त्यांची कविता मुखपृष्ठावर प्रसिद्ध होण्याचाही मान त्यांना मिळाला.

विविध विषयांवर १५०हून अधिक लेख देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. १९९६ साली वर्धा येथे झालेल्या तिसर्‍या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पहिल्या जागतिक बुद्ध-फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचेही (कल्याण २००२) ते अध्यक्ष होते, २००२ साली झालेल्या ‘वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्स’चेही अध्यक्षपद त्यांना लाभले. ‘दलित पँथर’चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष असलेल्या अरुण कांबळे यांना राष्ट्रीय एकता संघाचा ‘धम्मकीर्ती’ हा पुरस्कार लाभला. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचे पारितोषिक मिळाले. धम्मभूमी देहूरोड, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘प्रबुद्ध रत्न’ हा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना २००३ साली मिळाला.

 ‘अ‍ॅन अँथॉलॉजी ऑफ दलित लिटरेचर’ (संपादक मुल्कराज आनंद व डॉ.एलेना), ‘मॉडर्न इंडिअन पोएट्री’ (प्रीतीश नंदी), तसेच ‘सुडेशिअन’ (जर्मनी) यांमधेही कविता समाविष्ट असण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्रखर आंबेडकरनिष्ठा व अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वृत्ती हे त्यांचे वैशिष्ट्यआहे.

- सुहास बारटक्के

 

कांबळे, अरुण कृष्णाजी