Skip to main content
x

दाते, यशवंत रामकृष्ण

     यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म रत्नागिरीतील किन्हळ गावात झाला. बी.ए. व कायद्याची पदवी घेऊन १९१९ मध्ये ज्ञानकोशकार केतकरांच्या ज्ञानकोश मंडळात काम करण्यासाठी ते पुण्यात आले. विद्यासेवक मासिकाचे संपादन, स्थानिक शिक्षणासाठी सरस्वती मंदिरची स्थापना अशी कार्येही त्यांनी ज्ञानकोशाचे काम सांभाळून केली. ज्ञानकोश मंडळाने मराठीचा शब्दकोश तयार करावा अशी अनेकांची इच्छा होती, पण मंडळाला हे शक्य नसल्याने दातेंनी हे काम मनावर घेऊन शब्दकोश निर्मितीसाठी अन्य संपादकांसोबत स्वतंत्र संस्था स्थापन केली.

     या कोशाबद्दलची त्यांची आस्था आणि कळकळ प्रत्येक खंडासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून दिसून येते. आधुनिक कोशशास्त्राप्रमाणे कोश तयार करायचे म्हटले, तर हे काम अनेक दशके चालले असते. पण तेवढा वेळ, तेवढे अर्थसाह्य आणि तेवढ्या संख्येने भाषाशास्त्रज्ञ उपलब्ध नसल्याने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करून हा कोश बनवण्याचे आव्हान होते. केवळ प्रमाण भाषेतील रूपांवर समाधान न मानता, संपूर्ण भारतात जिथे-जिथे मराठी भाषा बोलली जाते, त्या-त्या ठिकाणच्या बोलींतील शब्दसंग्रह जमवून तो कोशात समाविष्ट करायचा, असा त्यांचा आग्रह होता. कोशासाठी विचारात घेतले गेलेले साहित्य आणि बोली यांचा पसारा प्रचंड मोठा असूनही कोशाचा पहिला खंड त्यांनी कर्वे यांच्यासोबत केवळ चार वर्षांमध्ये प्रसिद्ध केला. १९३२-१९३८ या काळात सात खंडांचा महाराष्ट्र शब्दकोश प्रसिद्ध झाला. या कोशांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना महाराष्ट्र भाषाभ्यास (१९३८) यात दात्यांनी संगृहीत केल्या. कोशाचा पुरवणी खंड १९५० मध्ये प्रसिद्ध झाला.

     याव्यतिरिक्त या द्वयीने ‘सुलभ विश्वकोश’ (६ भाग, १९४९-१९५१), ‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश’ (२ खंड, १९४२, १९४७) आणि ‘शास्त्रीय परिभाषा कोश’ (१९४८) हे प्रसिद्ध केले. दाते यांनी रा.त्र्यं. देशमुख यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्रीय वाङ्मयसूची’ (१९१९) तयार केली. कर्वेंसमवेत ‘डॉ. केतकरांचे सान्निध्य’ (१९४६) हे केतकरांचे लघुचरित्रही त्यांनी लिहिले आहे. ‘पिता-पुत्र संबंध’ (१९४३) या नावाचे सामाजिक लेखनही त्यांनी केले.

      सोलापूर येथे भरलेल्या मुद्रकसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाषाशास्त्रातील विद्वत्तेमुळे भारतीय राज्यघटनेचे हिंदी व मराठी अनुवाद करण्यासाठी नेमलेल्या समित्यांचे सभासद तसेच महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले. त्यांचे पुणे येथे निधन झाले. कोशनिर्मितीचे महत्त्व जाणून, जुन्या व आधुनिक  पद्धतींची योग्य सांगड घालून मराठी भाषेचा एक उत्तम कोश निर्माण केल्याबद्दल त्यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते.

ऋता पराडकर

दाते, यशवंत रामकृष्ण