Skip to main content
x

मोरे, सदानंद श्रीधर

     सदानंद श्रीधर मोरे यांचा जन्म अहमदनगरमध्ये झाला. डॉ.मोरे यांचे मूळ गाव संत तुकारामांचे देहू, जि. पुणे. ते तुकारामांचे दहाव्या पीढीतील वंशज आहेत. वडिल श्रीधरबुवा देहूकर यांच्याकडे संतवाङ्मयाचा अभ्यास पारंपारिक पद्धतीने केला. त्यांच्या वडिलांचे वास्तव्य देहूत असे. गावचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा मान होता. मोरे यांची आई संस्कृत शिक्षिका होती. सदानंद मोरे १९६८मध्ये एस.एस.सी. झाले. नंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.ए. आणि पुणे विद्यापीठातून १९७४ साली एम.ए. (तत्त्वज्ञान) झाले; शिवाय प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हे विषय घेऊन एम.ए. पदवी संपादन केली. विद्यापीठ अनुदान ंमंडळाचे णॠउ करिअर अ‍ॅवार्ड मिळाले आहे. ‘द गीता: अ थिअरी ऑफ ह्यूमन अ‍ॅक्शन’ या विषयावर प्रबंध सादर करून मोरे पीएच.डी. झाले. या सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी त्यांना गुरुदेव रानडे-दामले पुरस्कार मिळाला.

     डॉ.सदानंद मोरे विद्यापीठीय व्याख्याते असून पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विविध अध्यासनांचे समन्वयक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संतसाहित्यविषयक अनेक ग्रंथांचे तसेच सामाजिक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. तत्त्वज्ञान, साहित्य आणि इतिहास या विषयांमध्ये विपुल निबंध-लेखन केले आहे. सुमारे ५० संशोधनपर निबंधांचे विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशन झाले आहे. ‘संदर्भाच्या शोधात’, ‘वाळूचे किल्ले’, ‘बखर’ हे तीन कवितासंग्रह आणि ‘ढहश ॠशशींर : अ ढहशेीू ेष र्कीारप रलींळेप’, ‘घीळीहपर : ढहश ारप रपव हळी ाळीीळेप’ हे त्यांचे इंग्रजी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘मंथन’ (लेखसंग्रह), ‘ताटीचे अभंग: एक विवेचन’, ‘पालखी सोहळा: उगम व विकास’, ‘म.फुले यांचे राजकीय विचार’, ‘वारकरी साहित्य: स्वरूप आणि भूमिका’ (समीक्षा), ‘त्रयोदशी’, ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘निवडक पाळेकर’, ‘उजळल्या दिशा’ (नाटक) आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

     त्यांच्या ‘तुकारामदर्शन’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह १५ संस्थांचे पुरस्कार त्यांना लाभले; त्याचप्रमाणे ‘उजळत्या दिशा’ या नाटकासाठी त्यांना राज्यशासनासह १० संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमीचा ‘कै.रा.भि. जोशी’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. डॉ.सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या दोन खंडांत प्रसिद्ध झालेल्या बृहत ग्रंथांविषयी डॉ.य.दि.फडके यांचा अभिप्राय बोलका आहे, “या ग्रंथाद्वारे डॉ.मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकट्याने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे.”

- विद्याधर ताठे

मोरे, सदानंद श्रीधर